Monday 21 January 2019

भान आरोग्याचे: उत्कर्ष किशोरींचा





जसे कळीचे फुलात रूपांतर होते, तसे निसर्गनियमाप्रमाणे मुले-मुलीही वयात येतात. पण फुलात रूपांतर होण्याची प्रक्रिया जशी सहज-सुलभ, सुंदर असते, तितके हे वयात येणे सुलभ नसते. मुलगा वयात आला की तो मोठा झालाय, हे घर-दार स्वीकारते, पण मुलींच्या वयात येण्याच्या प्रक्रियेने त्यांच्यावर ‘सातच्या आत घरात’ सारखी बंधने येण्यास सुरूवात होते. तिचे मैदानी खेळ कमी होतात, कपडे कोणते घालावेत, कसे घालावेत, मुलग्यांशी कितपत मैत्री ठेवावी याचे कडक नियम बनविले जातात.
हे सगळे पाहून नुकतीच मासिक पाळी सुरू झालेल्या मुली आधीच ‘पाळी’ म्हणजे काय, हे नीटसं ठाऊक नसल्याने भांबावलेल्या असतात. शिवाय वागणुकीवर टाकल्या जाणाऱ्या बंधनाने त्या अधिकच अंतर्मुख होतात. या काळात गरज असते, एका समजूतदार मैत्रीच्या हाताची. तोच मैत्रीचा हात देण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ‘उत्कर्षा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत आहे. ‘उत्कर्ष किशोरींचा, विकास सिंधुदुर्गचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सप्टेंबर २०१६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा कार्यक्रम सुरू आहे.


सिंधुदुर्गमधील सर्व शाळांतील सहावी ते बाराची मुलींना हे मासिक पाळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिलं जातं. ग्रामीण भागात मुलींच्या आई- आजीचेच मुळात पाळीबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा असतात. त्यामुळे किशोरी तसेच त्यांच्या माता पालकांशी संवाद साधून मासिक पाळी या शरीरधर्माची शास्त्रीय माहिती पुरविणे, पाळी म्हणजे कसलीही नकोशी घटना नाही, विटाळ किंवा लपवून ठेवण्याजोगी गोष्ट नाही, तर पाळी ही मानववंशाचे सातत्य ठेवण्यासाठी मदत करणारी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन मुली आणि त्यांच्या पालकांमध्ये रुजविणे, पाळीच्या काळात काय काळजी घ्यावी, कसा आहार- विहार असावा याचे मार्गदर्शन करणे, हाच ‘उत्कर्षा’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.  
   

याकरिता २०१६ मध्ये युनिसेफच्या राज्य समन्वयक भारती ताहिलियानी यांनी शिक्षिका, आरोग्य सहायिका इ.८३७ जणींना मासिक पाळी व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले. पहिल्यांदा या शिक्षिका सुद्धा मासिक पाळीबाबत बोलायला लाजत होत्या. पण भारती ताहिलियानी यांनी गप्पा मारत, वेगवेगळे खेळ घेत महिलांना बोलते केले. या प्रशिक्षणामुळे शिक्षिकांमध्ये सकारात्मक बदल घडून आले. ताहिलियानी यांनी मासिक पाळीची शास्त्रोक्त माहिती दिली, उपस्थितांचे गैरसमज आणि अंधश्रद्धा कशा निराधार आहेत, ते सोदाहरण स्पष्ट केले.
या प्रशिक्षणार्थी आता शाळाशाळातून विद्यार्थिनी तसेच त्यांच्या मातांची जनजागृती करतात. या प्रशिक्षणामुळे घडलेल्या ठळक बदलांची उदाहरणे:

• कणकवलीमधील घोणसरी नं.१ शाळेतील एका विद्यार्थिनीने मासिक पाळीच्या वेळी पाळण्यात येणाऱ्या पारंपारिक रूढीवर बंड करून आईचं मतपरिवर्तन केलं.
• दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे सरगवे पुर्नवसन झरे शाळेतील एका विद्यार्थिनीची मासिक पाळी सुरू असताना शाळेतील शिक्षिकांनी तिला सरस्वती पूजनाच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं.
• वेंगुर्ल्यातील मोचेमाड नं.१ शाळेच्या समोर मंदिर असल्याने बऱ्याच मुली पूर्वीपासून पाळी आली की चार दिवस शाळेत गैरहजर असायच्या. ‘उत्कर्षा’ उपक्रमातील मासिक पाळीविषयक सत्रांमुळे त्यांना पाळी म्हणजे काहीही अशुभ नसते याची जाणीव झाली आणि त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या उत्कर्षा उपक्रमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/utkarsha-initiative-adolescent-gir…/


- मृणाल आरोसकर, सिंधुदुर्ग  #तेपाचदिवसतिलापरतमिळवूनदेऊया


No comments:

Post a Comment