Monday 21 January 2019

विधवांची संक्रांत

काकडहिरा (ता. बीड) येथील सासर असलेल्या मनिषा जायभाये यांचे पती रामकिसन भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. सन २००६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. सर्व काही सुरळीत असताना सन २००९ मध्ये रामकिसन यांचे अपघाती निधन झाले आणि सगळे चित्रच क्षणात पालटून गेले.
मनीषा म्हणतात, “शिक्षिका असूनही वैधव्यामुळे समाजातील मंगल कार्यांतून टाळण्यात आल्याचे अनुभव मला आले. आतापर्यंत सन्मानाने बोलवणारे लोक वैधव्यानंतर मात्र टाळताना दिसून आले. हा अनुभव मनाला लागला.”
 


  खरंतर, मकरसंक्रांत हा तिळगुळ देत एकमेकांना गोड बोलण्याचा संदेश देणारा सण. या दिवशी एकमेकींना वाण देत, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करुन सुवासिनी संक्रांत साजरी करतात. मात्र, नियतीच्या आघाताने वैधव्याचे दु:ख सोसणाऱ्या महिलांना अशा सणांमध्ये टाळले जाते.

मनीषा सांगत होत्या, “यातूनच मग गतवर्षी माझ्या गावातील काकडहिरा येथील विधवा महिलांना संक्रांतीला साडीचोळीचे वाण देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा 85 महिलांना साडीचोळी देण्यात आली. त्यावेळी मी लिंबारुई येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्याच वेळी लिंबारुईतही हा उपक्रम राबवण्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान, माझी बदली पालवण येथे झाली. 
तरीही यंदा लिंबारुईत ६५ महिलांना कालच म्हणजे १४ जानेवारी रोजी साडीचोळी देण्यात आली. यातून समाजात विधवांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.”  या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सविता गोल्हार, जिल्हा परिषद सदस्य रेखा क्षीरसागर, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यभामा बांगर यांचीही उपस्थिती होती.
मनीषा यांचे सासऱ्यांचेही निधन झाले आहे. त्यांची मुलगी प्रियंका दंतरोग तज्ज्ञ म्हणून सध्या शिक्षण घेत आहे. तर मुलगा प्रतिक यंदा बारावीत आहे दोन्ही मुलांचे या उपक्रमाला प्रोत्साहन आहे, असं मनीषा सांगतात.

- अमोल मुळे, बीड

No comments:

Post a Comment