Saturday 12 January 2019

पेठमधल्या ६०० महिलांचा उत्पादक गट, महिन्याभरात भात गिरणी सुरू करणार

नाशिक जिल्ह्यातला पेठ तालुका. १५० गावं. ग्रामपंचायती ७४. लोकसंख्या एक लाख ३० हजार. तालुका आदिवासीबहुल.लोकांची चार महिने पावसाच्या पाण्यावर शेती आणि नंतर आठ महिने रोजगारासाठी भटकंती. आता मात्र हे चित्र बदलत आहे. 'मानव अधिकार संवर्धन संगठन' च्या प्रयत्नातून. गेली चार वर्ष संस्था इथे काम करत आहे. ''या भागात आरोग्य आणि शिक्षणावर काम करत असताना वेगवेगळ्या प्रश्नांचा गुंता समोर येत होता. पोटापाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असल्याचं लक्षात आलं.'' संस्थेच्या सचिव श्यामला चव्हाण सांगत होत्या. संस्थेनं महिलांना हाताशी धरलं. वर्षभरापासून संस्था उत्पादक गट संकल्पनेवर काम करत आहे. स्थलांतराऐवजी आदिवासींना गावातच रोजगाराचं काय साधन उपलब्ध होईल? यावर विचार 
झाला. भात पिकावर काम करण्याचं ठरलं. भाताचं उत्पादन घेण्यासाठी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा अवलंब केला नाही. तर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला. या प्रयत्नात ६००हून अधिक महिला सक्रिय झाल्या. त्यांचे ४१ उत्पादक गट. त्यांना वेगवेगळ्या सामाजिक संस्था, कृषी विभागाच्या मदतीनं प्रक्रिया उद्याोगाची माहिती देण्यात आली.ब्राऊन राईस-व्हाईट राईस याचं प्रशिक्षण दिलं. महिलांनी तयार केलेल्या भाताला बाजारपेठ मिळावी यासाठी संस्थेनं नवमाध्यमांवर, वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिध्दी करत या मालाची विक्री केली आहे. नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणीही विक्री झाली. यातून सध्या खूप आर्थिक उत्पन्न मिळालं नसलं तरी खर्च निघाला. महत्त्वाचं म्हणजे महिलांना व्यवहार समजायला लागला असल्याचं श्यामलाताई सांगतात. या महिलांचं जीवनमान बदलू लागलं आहे. सध्या घरगुती स्वरूपात होणारं काम आता गिरणीत होणार आहे. इंडिगो आणि 'अफार्म' सामाजिक संस्थेच्या मदतीनं महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे. पेठ तालुक्यातील उत्पादक गट ‘भात गिरणी’ सुरू करणार आहेत.

-प्राची उन्मेष , नाशिक

No comments:

Post a Comment