Friday 11 January 2019

पालावरची शाळा

ऊसतोडणी कामगार आणि स्थलांतरित मजूर हे पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने दिसणारे चित्र. दिवाळीनंतर ऊसतोडणी कामगारांची पाले पडायला सुरूवात होते. 2017 मध्येही बार्शीच्या कासारवाडी परिसरातील शिवारात अशीच ऊसतोडणी कामगारांची मोठी टोळी आलेली होती.
ही सगळी कुटुंबे विदर्भातील हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे समजलं. या ऊसतोडणी कामगारांसोबत 24 लहानगी मुलंही आहेत हे आम्हांला सर्वेक्षणातून समजलं. या मुलांचं शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही त्या पालावरच मांडी ठोकून बसलो आणि मुलांशी गप्पा मारू लागलो, त्यांना आणलेला खाऊ दिला. ‘शाळेत पुन्हा यायला आवडेल का?’ हे विचारलं.


सगळी बच्चेकंपनी आनंदाने तयार झाली. मग आम्ही त्यांच्या पालकांना भेटून शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं. “तुम्ही तुमच्या पोटापाण्यासाठी गाव सोडून इकडे आलात, पण बरोबर मुलांनाही घेऊन आलात. यामुळे त्यांची शाळा बुडते आहे. शिक्षणाशिवाय चांगलं भविष्य नाही, तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवा” अशी विनंती आम्ही करत होतो. या मुलांना जवळच्या जिल्हा परिषद शाळा कासारवाडी इथं दाखल करावं, असंही आम्ही सुचविलं. पण, त्यांच्या वस्तीपासून शाळा चार किमी दूर असल्याने रहदारीच्या रस्त्यावरून मुलांना एकटे पाठविण्यास नकार देत पालक शाळेत पाठविण्यास विरोध दर्शवित होते.शेवटी यावर पर्याय ठरला- पालावरच्या शाळेचा!! या शिवारात पालांसमोरच असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आम्ही ही पालावरची शाळा सुरू करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेसातला आम्ही आलो तेव्हा 24 मुलांपैकी फक्त तीनच मुले या अनौपचारिक शाळेत हजर होती. बाकीची मुलं पाणी भरत होती किंवा भाकऱ्या थापत होती. आम्ही पुन्हा त्यांच्या पालकांशी बोललो आणि मुलांना शाळेत पाठविण्याचा आग्रह केला.  
शेवटी पालकांनी एकदाची मुलं आमच्याकडे सुपुर्त केली. मळलेल्या कपड्यात, नखं वाढलेली, आणि आंघोळ न केलेली पारोशी मुलं. म्हणूनच या शाळेच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवातच झाली ती स्वच्छ आंघोळीने, नेलकटरने नखं कापून आणि तेल लावून छान भांग पाडून!! शाळा अशी पण असते, हे मुलांना आणि त्यांच्या ऊस तोडणाऱ्या पालकांना माहितीच नव्हतं. मॅडम आणि सर छान आंघोळ घालतात, स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगत नखं काढून देतात, स्वच्छ कपडे घालायला लावतात, हे सगळं मुलं खूप उत्साहाने अनुभवत होते आणि त्यांच्या पाल्यांप्रति असलेले आमचे प्रेम पाहून पालकांचा विश्वास जिंकून घ्यायला आम्ही सुरूवात करीत होतो.
मग त्या दिवशीनंतर थेट अभ्यास सुरू करण्यापेक्षा कुणाला गाणी, गोष्टी, नाच येतो का, याची चाचपणी करीत आम्ही मुलांना कला सादर करायला प्रवृत्त केलं. मग हळूहळू जमिनीवरच्या मातीत रेघोट्या मारून मुलांना अक्षरओळख करून दिली, त्यांचं नाव लिहायला लावलं. दगडं, उसाच्या कांड्या, पानं- फुलं, काड्या, भाकऱ्या वापरून अंकओळख आणि बेरीज- वजाबाक्या शिकवल्या. मुलं या अनोख्या अभ्यासात खूपच रमायला लागली. मग आम्ही मोबाईल अॅप्सचा वापर करून मुलांना विविध विषयांची तोंडओळख करून देऊ लागलो. हे रंगीत, हलत्या- बोलत्या व्हिडिओंचं जग तर मुलांना फारच आवडलं.
बार्शीतील पालावरच्या शाळेबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/mr/school-inside-tent-settlement/
- लक्ष्मी तोरड आणि अविनाश मोरे, बार्शी, सोलापूर
#नवीउमेद Snehal Bansode Sheludkar






No comments:

Post a Comment