Tuesday 12 February 2019

उजेडची अनोखी गांधीबाबा यात्रा

“सर्वांना सुखाचा घास अन श्वास मिळावा म्हणून निःस्वार्थी भावनेने उभे आयुष्य कारणी लावणारा माणूस देवापेक्षा वेगळा नसतो. इंग्रजांच्या जुलमी जोखडातून देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधींजीनी उभे आयुष्य कारणी लावले. तेच आपणा सर्वांचे देव आहेत...” लातूर जिल्ह्यातील उजेड गावचे अजित कदम त्यांच्या गावातील अनोख्या गांधीबाबा यात्रेबद्दल सांगत होते. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ लातूर जिल्ह्यातील उजेड या गावी २४ ते २७ जानेवारी दरम्यान गांधीबाबा यात्रा भरते.

या यात्रेमागची कहाणी मोठी रंजक आहे. याबाबत अजित म्हणाले, “पूर्वी हिसामाबाद नावाने ओळखलं जाणारं उजेड हैदराबाद संस्थानात होतं. चांदपाशा पटेल यांच्याकडे गावचा कारभार होता. त्यावेळी गावात पिराचा उरूस भरत असे. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं. नंतर ऊरूस बंद पडला. स्वातंत्र्यानंतर तो पुन्हा सुरू करण्याची इच्छा चांदभाईंना झाली. यासाठी त्यांनी पंचायत बोलावली. पण हिंदूना महादेवाची यात्रा तर मुस्लिमांना पिराचा उरूस हवा होता. दोन गट पडले. शेवटी हा तिढा सोडवण्याची जबाबदारी ग्रामस्थांनीच चांदभाई, राम रेड्डी, गोविंद मास्तर, भीमराव रेड्डी, वामनराव पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, नारायण खोडदे, धोंडीराम बिराजदार, राजाराम कांबळे, बाजीराव पाटील, शिवलिंग स्वामी, दिगंबर पटवारी यांच्यावर सोपवली. ही मंडळी जो निर्णय घेतील तो सर्वमान्य राहील असं ठरलं. एक दिवसानंतर पुन्हा पंचायत बसली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीबाबा हेच आपले देव आहेत. त्यांच्या नावाने यात्रा सुरू करावी असा सल्ला या मंडळींनी दिला. काही तासांपूर्वी गंभीर असलेल्या गावकऱ्यांनी या निर्णयाचं साखर वाटून स्वागत केले. वर्गणी काढली गेली. आणि हैदराबाद येथून गांधीजींचा पुतळा आला. २६ जानेवारी १९५४ पासून गांधीबाबा यात्रा सुरू झाली.

या यात्रेसाठी सासुरवाशिणी माहेरी येतात. त्यांना मानाची साडी - चोळी केली जाते. नातेवाईकानाही आग्रहाचे निमंत्रण मिळतं. नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या व्यक्ती उजेडला येतात. पंचक्रोशीतील गावकरीही सामील होतात. घरा-घरात गोडधोड होते; चौकात बाजार भरतो. दीपावलीचं वातावरण गावभर तयार होतं. २४ जानेवारीला ग्रामपंचायतीतील महात्मा गांधींचा पुतळा वाजत गाजत चौकात स्थापन केला जातो. त्याचं पूजन केलं जातं. आणि प्रजासत्ताक दिनी त्यास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. राष्ट्रभक्ती जागवणारे कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जातात. जिल्हा परिषदेच्या वतीने पशुप्रदर्शन भरते. आणि कुस्ती स्पर्धेने यात्रेची सांगता होते.
यात्रा सुरू झाली तेव्हा गावात विजेची सोय नव्हती. चांदभाईंचे बंधू अब्दुल यांनी पाण्याच्या इंजिनवर वीज निर्माण करून अनेक बल्ब सुरू केले होते. यामुळे गांधी चौक लखलखत होता. पहिलं गांधी पूजन आणि ध्वजारोहणासाठी त्यावेळच्या उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. हा माहोल पाहून ते आश्चर्यचकित झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील या गावातच असा उजेड मी पाहिला त्यामुळे या गावाला आता उजेड म्हणावं लागेल, असं ते सहज बोलून गेले. तेव्हापासूनच हिसामाबादचं नाव उजेड झालं.
इथली माहेरवाशीण ज्योती कदम म्हणते, “दिवाळी, पंचमीसारखीच आम्हाला गांधीबाबा यात्रेची ओढ असते. त्यानिमित्ताने माहेरला जाणं होतं. मैत्रिणींना भेटणं होतं. ख्यालीखुशाली कळते. मानाची माहेरची साडीही मिळते.”

- प्राजक्ता जाधव, लातूर 

No comments:

Post a Comment