Friday 22 February 2019

औषध विक्रेत्यांचे ‘अन्नछत्र’

जिल्हा बीड. माजलगाव तालुका. इथं खेड्यापाड्यातून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची बरीच गर्दी असते. उपचारांसाठी तालुक्याला आलं की पेशंटचे आणि सोबत आलेल्या नातेवाईकांचे जेवणाचे हाल ठरलेले. कारण अर्थातच, पेशंट दवाखान्यात भरती केल्यावर गावातून जेवण कसं आणणारं? हे जाणूनच माजलगाव येथील काही औषध विक्रेते एकत्र आले. पेशंटच्या नातेवाईकांची ही स्थिती नेहमीच त्यांच्या नजरेसमोर येत होती. त्यातूनच त्यांनी या पेशंटसाठी अन्नछत्र सुरू करायचं ठरवलं. आज रोज तीनशे रुग्णांना डबा पोहचवला जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून अखंडितपणे हा उपक्रम सुरू आहे हे याचं विशेष.
माजलगाव शहराचा विस्तार मोठा. लोकसंख्या 55 ते 60 हजार. आणि पूर्ण तालुक्याची लोकसंख्या 2 लाखाच्या आसपास. शहरात मोठी रुग्णालये आहेतच. शिवाय शासनाचे ग्रामीण रुग्णालयही आहे. त्यामुळे तालुकाभरातून शेकडो रुग्ण दररोज माजलगावतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल होत असतात. 



नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे तर कधी रुग्णाजवळ इतर कुणीच नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर जेवण मिळायचं नाही. काहीवेळा माजलगावात नातेवाईक नसल्यानेही रुग्णांसाठी जेवण मिळवणं अवघड व्हायचं.
अन्नछत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप शिनगारे म्हणतात, “ज्या रुग्णांना औषधं विकून आपल्याला फायदा होतो, त्याच कमाईतील काही हिस्सा त्यांच्या जेवणावर खर्च करावा अशी कल्पना पुढे आली. आणि माजलगावातील २४ औषध दुकानदारांनी दीड वर्षांपूर्वी अन्नछत्र सुरू केलं. महिन्याला दोन हजार रुपयांचा निधी प्रत्येकजण यासाठी देतो. त्यातून किराणा साहित्य घेतलं जातं. एक बाई स्वयंपाक करतात. आणि रोज सकाळी शहरातील सर्व खासगी व ग्रामीण रुग्णालयात अन्नाचे पॅकेट पोहचवण्याचे काम केलं जातं. रोजचं एकवेळचं जेवण या रूग्णांना अन्नछत्रतर्फे दिलं जातं. हे काम पाहून लक्ष्मण डक यांनी एक गाळाही स्वयंपाक व अन्नाची पाकीटे पॅक करण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला आहे.”  विनोद शर्मा म्हणाले, “रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा समजली जाते. ती करण्याचाच आम्ही प्रयत्न करतो आहेत. यापुढे आता शहरात अनाथालय सुरू करून मुलांसाठीही काम करण्याचा प्रयत्न आहे.”
- अमोल मुळे, बीड

No comments:

Post a Comment