Friday 22 February 2019

सदा आबाची ऐका वाणी...


बीड जिल्ह्यातला एक शेतमजूर सदा आबा. इतर अनेकांप्रमाणे दुष्काळाने पोळतोय. कुटुंबाला जगवायला धडपडतोय. त्याची कहाणी आणि अशाच अनेक कहाण्या तोच आपल्याला सांगतोय.
"आमचा लाडका गणू. औंदाचं गणूचं हे शाळेतलं पहिलचं वरीस. दिसभर मोलमजूरी करुन सांजवेळी घरात पाय टाकताच गणू मह्याजवळ यतो, आणिक "अाबाव आज मी दोनाचा पाढा शिकलो, आज मी कविता बी शिकलो", असं म्हणत बिलगतो, तवा जीव ओवाळून टाकावं वाटतं या पोरावर.
आमच्या समद्या घराचा गणूवर भारी जीव. दिसभरं राब-राब राबवणारे आम्ही, गणू दोन पाढे काय बोलला झोपडीत पडून पोरं चांगल नाव काढीनं हे सपान रंगवतो. हे सार रहाट गाडगं सुरुचं व्हतं. पण औंदा जरा इपरीतचं घडलं.
पीक उगली नाहीत तोवरसक पावसानं पाठ फिरीली अन‌् लोकाच्या शेतात उभं पीक करपलं. पाणी आटल्यानं रस्ता, बांधकामबी बंद पडली आणिक आमास्नी काम मिळना झालं. आठ दिस मोक्कार बसलो. पर आयतं बसून घास अन कोसभर चालून बाईलीनं आणलेल्या पाण्याचा घोट नरड्यात उतरना.
काम मिळण्याची चिन्हचं नव्हतं. इचार करीत पडलो होतो, तवा शेजारल्या वस्तीवरल्या सखाराम पवार आलान मला बोलला, "अरं मोक्कार बसुस्तर चल म्हयासंग ऊसतोडीला."
आम्हीबी काय नडल्यालो, जाऊ बोललो. तसंबी मला
इकडं जवळचं गणगोत नाय. मी, महि बायको रंजना व आमच्या काळजाचा तुकडा, गणू. हेच मह जग.
मंग काय तडक मुकादम गाठला, उचल घेतली.
झालं पैसा खिशात आला, पण सुख नव्हतं. माह्या डोळ्यापुढे गणूचा इचार. त्याच्या साळेचं कसं व्हयाच?
मधेचं मास्तरला भेटलो तवा ते बोलले, "अहो शिंदे पोरगा हुशार आहे, त्याच्या शिक्षणात नका खंड पाडू. त्याला राहुद्या इथं हंगामी वसतिगृहात."
पर माझं तर तवापास्न डोस्कचं बंद. पोरंग खाईल कुठ, लागलं, पडलं, खुपलं तर कोण बघल. नुसतं ईचारांचं वावटळ. इकडं फडावर जायाची घडी आली. बोजा, बिस्तरा, जितराब. समद ठरलं काय न्यायचं, काय ठेवायचं. फकस्त गणुच काय ठरत नव्हतं. आखरीस म्या ठरील नग एकटं सोडायला जीवाच्या तुकड्याला. तो दिस उजाडला, भल्या पहाटे आम्ही अवघा संसार ट्रॅक्टर ट्रॉलीत भरला. गाडी निघाली, गाव सूटल, पुढं सहा महिने कोयता, मी अन रंजना, आमची गाठ बसणार पर माह्या गणूची पाटी, पुस्तकाची गाठ मात्र सुटली...
(मित्रांनो, ही काल्पनिक नाही, खरीखुरी गोष्ट आहे, पारगांव (जि.बीड) च्या एका गणूची. याच केंद्रातील एका जिल्हा परिषद शाळेतून असे २२ गणू पालकांसह कारखान्यांवर स्थलांतरित झालेत. इयत्ता पहिली ते तिसरीचे हे सारे विद्यार्थी. त्यांचं दुर्दैव असं की जिल्ह्यातील ज्या कारखान्याच्या हद्दीत पालक उसतोडीला गेले तिथं ना साखर शाळा आहे, ना कुठलीही पायाभूत सुविधा. त्यामुळं यांचं भविष्य राम भरोसेचं.) llभाग 1ll
- अनंत वैद्य, बीड.

No comments:

Post a Comment