Tuesday 12 February 2019

असंही वाण

नुकतीच संक्रांत झाली. त्यामुळे आता रथसप्तमीपर्यंत सर्वत्र हळदी कुंकू, लुटायचे वाण यांची नुसती रेलचेल बघायला मिळते. नाशिकच्या आत्मजा या महिला गटानेही असं वाण लुटायचं ठरवलं. पण, परिस्थितीनुसार त्याचं स्वरूप त्यांनी बदलायचं ठरवलं.
गटातील यशश्री रहाळकरने नाशिक येथील ‘पडसाद’ या कर्णबधीर विद्याालयात गरजेचे साहित्य देण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला अर्चना काळे, आरती गरूड, कीर्ती मांगळे, गीता साळसकर, स्वाती कुलकर्णी, रुपल मेहता यांनी प्रत्यक्षात आणलं. शैक्षणिक साहित्याच्या पलीकडे विद्यार्थ्यांच्या काही गरजा असतात हे लक्षात घेत प्रत्येकीने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार २०० रुपये प्रत्येकी अशी रक्कम गोळा केली. या जमा झालेल्या रकमेतून या गटाने मुख्याध्यापिका सौंदाणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेतलं. विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. मुलांना कपडे धुण्याचा साबण आणि ब्रश, तर मुलींना सॅनिटरी पॅड घेण्यासाठी मदत देण्यात आली.

याविषयी यशश्री रहाळकर म्हणाल्या, “वाण लुटणं म्हणजे केवळ वस्तुंची देवाण घेवाण नसते. त्यातून स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो. प्लास्टिकच्या किंवा अन्य वस्तू ज्या आपल्याकडे आहेत. त्या वस्तू जमा करण्यापेक्षा गरजवंताला मदत करणे महत्त्वाचे आहे, ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. ही शिकवण रुजवण्याचाच हा छोटासा प्रयत्न. पडसादमधील विद्यार्थी हे वंचित समाजातून आले आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्या खूप साध्या आहेत. याचा विचार करत हे पाऊल आम्ही उचललं. मुलांना साबण आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी पैसे देत या सणाचा वेगळ्या पध्दतीने आनंद लुटला याचं समाधान वाटतं.”
एरवी संक्रातीचा सण आला की महिला आपल्या परिसरातील सुवासिनींना बोलावून वाण लुटण्यात दंग होतात. यात प्रामुख्याने प्लास्टिक बरण्या, वाट्या, चमचे, शोभेच्या वस्तु, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, पापड, लोणचे, सौंदर्य प्रसाधने अशा विविध वस्तुंचे वाण लुटले जाते. काही वर्षापासून पर्यावरणपूरक संक्रातचा संकल्प करत काही महिला कापडी पिशव्या, पुस्तकं, शोभेची फुलझाडं, चिमणीचं घरटं, तुळशीचं रोप अशा पर्यावरणपूरक पर्यायाचा अवलंब करत सुवासिनीला वाण देत आहेत. मात्र ‘आत्मजा’ महिलांच्या समुहाने संक्रातीचं वाण लुटण्यात सामाजिकदृष्ट्या अजून एक पाऊल पुढं टाकलं. सुमारे २० महिलांचा हा गट ‘स्व ते समाज’ या शीर्षकाखाली एकमेकींशी जोडला गेला आहे. स्वत:चे व्यक्तीमत्व खुलवत असतांना आपण समाजाचे काही देणे लागतो, त्यासाठी काय करू शकतो या विचाराने प्रेरित होत आत्मजाचे काम सुरू आहे. महिन्याकाठी शहर परिसरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेट द्यायची, तेथील समस्या समजून घ्यायच्या त्यावर काम करायचं हा यांचा दिनक्रम.

- प्राची उन्मेष, नाशिक

No comments:

Post a Comment