Monday 23 April 2018

एक आहे उमा



उमा क्षीरसागर. जालन्यातील कडवंची गावातील एका साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगी. वंशाला दिवा मिळेल या अपक्षेने या कुटुंबात जन्मलेल्या आठ मुलींपैकी सातवी. वडील नारायण क्षीरसागर यांनी 30 वर्ष सालगडी म्हणून काम केलं. उमाच्या सहा बहिणी आणि आई अशा सगळ्याजणीच दुसऱ्याच्या शेतीत राबल्या. सहाही मुलींची लग्नं झाली. नंतर नारायण यांनी गावात सहा एकर जमीन विकत घेतली. आता हक्काच्या शेतात राबण्यासाठी मात्र नारायणराव, उमाची आई, अवघ्या 12 वर्षांची उमा आणि सगळ्यात धाकटी 10 वर्षांची मतीमंद बहीण.



जमीन घेऊन झाली. आणि काही काळातच नारायण क्षीरसागर यांचा अपघात झाला. गुडघे फ्रॅक्चर झाले. तेव्हा 6 एकरपैकी एक एकरात द्राक्षबाग उभी राहिली होती. वडिलांचा अपघात झालेला. आई वृद्धत्वाकडे झुकलेली. बहीण मतिमंद. शेतीकडे कोण पाहणार? शेती ओसाड होऊन पुन्हा गरिबीत जीवन कंठायची वेळ येणार या भितीने उमा चिंताग्रस्त झाली.
कुटुंबाचा सहारा होण्यासाठी 13 व्या वर्षात उमाने कंबर कसली. द्राक्षबागेसह शेतीची सूत्र आपल्या हातात घेतली.
लहानपणापासून शेती कशी करतात, पिकं कशी घेतात, द्राक्षबागेला कोणती औषधं कशी फवारतात हे सगळं ती बारकाईनं बघत होतीच. आतापर्यंतचं निरीक्षण आणि वडिलांचं मार्गदर्शन यामुळे उमाचं मनोधैर्य वाढलं. कष्ट कामी आले आणि द्राक्षबाग बहरली. दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं. आता तिनं शेतात गहू, ज्वारी, कापूस आणि तुरीचंही पीक घेतलं. आत्मविश्वास दुणावला. मुलीदेखील उत्तम शेती करू शकतात, हे तिनं दाखवून दिलं. आज उमाचं वय 19 वर्ष आहे. ती म्हणते, "आई-वडिलांचं स्वप्न मी साकार केलं आहे. म्हणूनच आई-वडिल मला ‘वंशाचा दिवा’ मानतात”.
उमाच्या आवडिलांचं स्वप्न साकार झालं. पण उमाच्या स्वप्नाचं काय? तिला खूप शिकून मोठं अधिकारी व्हायचं होतं. तिच्यासारख्या अनेक उमा आहेत. त्यांची स्वप्न पुरी होतील, हे बघण्याची जबाबदारी शासनाची, समाजाची.

- अनंत साळी.

No comments:

Post a Comment