
भौतिक रूप सुंदर बनविताना शिक्षकांनी गुणवत्तेकडेही दुर्लक्ष केलं नाही. शाळेची वेळ सकाळी 9.30 – दुपारी 4.30 अशी आहे. पण कानफोडीच्या शाळेत शिक्षक सकाळी 7.30 वाजताच हजर असतात. शाळा भरण्याआधी आणि शाळा सुटल्यानंतरही एखादा तास मुलांचा जादा अभ्यास घेतला जातो. याविषयी मुख्याध्यापक किशन जाधव सांगतात, “आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का करण्याच्या प्रयत्न करतो. त्यामुळे मुळाक्षरे, 1 ते 100 अंक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांचा जास्तीत जास्त सराव करुन घेतला जातो. वाचन, वाक्यविस्तार, गोष्ट तयार करणे असे भाषेशी संबंधित खेळही घेतले जातात. अभ्यासात मागं असणाऱ्या मुलांसाठी आम्ही हे जादा तास घेतो. याचा परिणाम म्हणून आमच्या शाळेतला पहिलीतला विद्यार्थीसुद्धा दीड महिन्यात वाचायला लागतो. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वजाबाकी आणि भागाकारासारख्या अवघड गणिती क्रियांमध्ये तरबेज आहे. इतकंच नाही, तर कोणताही विद्यार्थी अब्जापर्यतची संख्या लिहून त्याची स्थानिक किंमतही सांगू शकतो.”

2016 सालापासून कानफोडीची शाळा एबीएल (Activity Based Learning) शाळा झाली आहे. त्यामुळे इथं कृतियुक्त शिक्षणावर भर दिला जातो. मुलांचा स्तर निवडून त्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार अभ्यास घेतला जातो. कानफोडी शाळेतले विद्यार्थी आता इतके तयार झालेले आहेत की अगदी पहिलीचा विद्यार्थीसुद्धा तिसरीच्या स्तराचा अभ्यास करुन दाखवतो. याचाच परिणाम म्हणून की काय गावात माध्यमिक शाळेत जाणारे अभ्यासात मागे राहिलेले काही विद्यार्थी सुद्धा कानफोडी शाळेच्या जादा तासांना अभ्यासासाठी येतात. आणि जाधव सर, नेवरे सर ही अधिकची कटकट, असं न म्हणता ज्ञानरचनावादी पद्धतीने त्यांच्याही समस्या सोडवून त्यांना अभ्यासाची गोडी लावत आहेत.
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर
No comments:
Post a Comment