Saturday 7 April 2018

लोकल- ग्लोबलचा ताळमेळ साधणारी सुमठाणा शाळा

“वाढीच्या वयातल्या मुलांना एका जागी बसणं नकोसं होतं. त्यांच्या हाताला सतत काहीतरी काम हवं असतं. त्यामुळे पारंपारिक शिक्षणपद्धतीपेक्षा त्यांना हालचालींना वाव देणारी ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांना अर्थातच जास्त आवडते. पण त्यासोबत आमच्या शाळेत मी ओरिगामीसारख्या कागदी घड्यांनी आकृत्या बनविण्याची चिनी ‘टॅग्राम’ कार्यानुभव पद्धती वापरतो. शिवाय चुंबकीय मणी एकमेकांना जोडून वेगवेगळे आकार तयार करण्याची ‘ब्रेनी क्यूब’ ची साधनंही आवर्जून वापरतो. हे सगळं करण्यात विद्यार्थी अगदी दिवसभर रमून जातात आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला पर्यायाने मेंदूविकासालाही चालना मिळते”, संतोष लोहारे उत्साहात माहिती देत होते. लातूरच्या सुमठाणा जिल्हा परिषद शाळेत ते मुख्याध्यापक आहेत.
खरोखर, त्या दिवशी माझ्यासमोर तिथल्या विद्यार्थिनीने ब्रेनी क्यूबच्या चुंबकीय मण्यांच्या माळा आणि कानातली कर्णफुलं तयार करुन घातली. हे करताना तिला खूप मजा येत होती.
सुमठाणा शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या शाळेत विद्यार्थ्यांची गणिताची भीती कमी करण्यासाठी त्यांना ‘अबॅकस’चे धडेही दिले जातात. अगदी अंध मुलांनाही सर्वोत्तम शिक्षण मिळावं म्हणून, लोहारे सरांनी ब्रेल लिपी शिकून घेतली आहे. इतकं नाही, तर त्यांच्या शाळेतील काही सामान्य मुलांनासुद्धा ब्रेल लिपी चांगल्या प्रकारे येते.


शाळेत दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाला ग्रामपंचायतीसमोर भाषण स्पर्धा होतात. 2012 सालचा विषय होता, ‘दारुबंदी’. दारुचे तोटे, त्याचा आरोग्यावर आणि कुटुंबावर होणारा दुष्परिणाम अतिशय परिणामकारकपणे विद्यार्थ्यांनी मांडला. गावातील महिलांना यांतून प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी डीवायएसपी कार्यालयावर मोर्चा नेला. त्यानंतर पोलिस पथकासोबत गावातील तीन तांड्यांवरचे हातभट्टी दारु कारखाने त्यांनी उद्धवस्त केले. महिलांमध्ये अचानक झालेल्या या जागृतीने डीवाएसपीसुद्धा चकित झाले होते. त्यावेळी महिलांनी सगळे श्रेय शाळेतील विद्यार्थिनींनी केलेल्या दारुबंदीवरच्या भाषणाला दिलं.
मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी रुजाव्यात यासाठी शिक्षक आग्रही असतात. त्यातून उघड्यावर शौचाला जाऊ नये, जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने धुवावेत, नखं वेळेवर काढावीत या गोष्टी शिकवल्या जातात. शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळे विद्यार्थी आपल्या घरीही शौचालय हवं यासाठी कमालीचे आग्रही आहेत. 2015- 2016 साली लोहारे सरांच्या कल्पनेतून ‘पालकांना पत्र’ हा एक अनोखा उपक्रम घेतला गेला. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या आई- वडिलांना पोस्टकार्डवर पत्र लिहून घरी शौचालय बांधण्याची विनंती केली आणि खरोखरच्या टपालाने ही पत्रं पालकांना पाठवली गेली. त्यामुळेच आज गावातील 90% घरांमध्ये शौचालय बांधलं गेल्याचं लोहारे सर सांगतात. तसेच सुमठाणा ग्रामपंचायतीनेही, ‘ज्याच्या घरी शौचालय त्यालाच नळजोडणी’ असं अभियान राबवलं. आता सुमठाणा 100% स्वच्छतागृह असलेले गाव होण्याच्या मार्गावर आहे.

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

No comments:

Post a Comment