
खरोखर, त्या दिवशी माझ्यासमोर तिथल्या विद्यार्थिनीने ब्रेनी क्यूबच्या चुंबकीय मण्यांच्या माळा आणि कानातली कर्णफुलं तयार करुन घातली. हे करताना तिला खूप मजा येत होती.


शाळेत दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाला ग्रामपंचायतीसमोर भाषण स्पर्धा होतात. 2012 सालचा विषय होता, ‘दारुबंदी’. दारुचे तोटे, त्याचा आरोग्यावर आणि कुटुंबावर होणारा दुष्परिणाम अतिशय परिणामकारकपणे विद्यार्थ्यांनी मांडला. गावातील महिलांना यांतून प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी डीवायएसपी कार्यालयावर मोर्चा नेला. त्यानंतर पोलिस पथकासोबत गावातील तीन तांड्यांवरचे हातभट्टी दारु कारखाने त्यांनी उद्धवस्त केले. महिलांमध्ये अचानक झालेल्या या जागृतीने डीवाएसपीसुद्धा चकित झाले होते. त्यावेळी महिलांनी सगळे श्रेय शाळेतील विद्यार्थिनींनी केलेल्या दारुबंदीवरच्या भाषणाला दिलं.
मुलांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी रुजाव्यात यासाठी शिक्षक आग्रही असतात. त्यातून उघड्यावर शौचाला जाऊ नये, जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने धुवावेत, नखं वेळेवर काढावीत या गोष्टी शिकवल्या जातात. शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळे विद्यार्थी आपल्या घरीही शौचालय हवं यासाठी कमालीचे आग्रही आहेत. 2015- 2016 साली लोहारे सरांच्या कल्पनेतून ‘पालकांना पत्र’ हा एक अनोखा उपक्रम घेतला गेला. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या आई- वडिलांना पोस्टकार्डवर पत्र लिहून घरी शौचालय बांधण्याची विनंती केली आणि खरोखरच्या टपालाने ही पत्रं पालकांना पाठवली गेली. त्यामुळेच आज गावातील 90% घरांमध्ये शौचालय बांधलं गेल्याचं लोहारे सर सांगतात. तसेच सुमठाणा ग्रामपंचायतीनेही, ‘ज्याच्या घरी शौचालय त्यालाच नळजोडणी’ असं अभियान राबवलं. आता सुमठाणा 100% स्वच्छतागृह असलेले गाव होण्याच्या मार्गावर आहे.
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर
No comments:
Post a Comment