Monday 9 April 2018

पपई, डेंग्यूवर संशोधन करणाऱ्या डॉ मंजिरी कुलकर्णी टोकिओ विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञपदी


मूळच्या जालन्याच्या डॉ . मंजिरी कुलकर्णी या आठवड्यात जपानच्या टोकियो कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून रूजू होत आहेत. डॉ.मंजिरी यांना परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संशोधनाचं बाळकडू मिळालं. त्यांचं संशोधन पपई आणि डेंग्यू दोन्हीसाठी उपयुक्त ठरणारं आहे. पपईतील रिंग्ज स्पॉटमुळे देशातल्या तसंच जगातल्या पपईची 80 टक्के उत्पादनक्षमता कमी होते. हे विषाणू संपवणं गरजेचं आहे.त्याचबरोबर पपईच्या पानांच्या अर्कात काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे डेंग्यू बरा होऊ शकतो. अशा प्रकारचे गुणधर्म वापरून औषध किंवा लस तयार करण्याबाबत सध्या संशोधनपर चाचण्या सुरू आहेत असं डॉ मंजिरी यांनी सांगितलं. अलीकडेच परभणीच्या कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या आल्या होत्या. डेंग्यूचे चार प्रकार आहेत . त्यावर लस उपलब्ध असली तरी अद्याप ती परिपूर्ण नाही. यासंदर्भात मंजिरी यांनी केलेलं संशोधन डेंग्यूवरची लस तयार करण्यासाठी 'मूलभूत संशोधन' म्हणून वापरलं जाणार आहे. 
2008 मध्ये त्या बीएससी कृषी झाल्या. त्यानंतर तामिळनाडू कृषि विद्यापीठात पपईतील विषाणूंवर (रिंग्ज स्पॉट) संशोधन करून जैवतंत्रज्ञान शाखेत त्या एम .एस्सी. झाल्या. 2011 मध्ये जपान सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या देशातल्या मंजिरी एकमेव होत्या. तेव्हा जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचा फैलाव झाला होता. त्याआधी जपानमध्ये डेंग्यू नव्हता. या पार्श्ववभूमीवर टोकियो विद्यापीठात डेंग्यू विषाणूवर संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केली. अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये संशोधनपर लेख त्यांनी सादर केले आहेत. जपान सरकारनं आंतरराष्ट्रीय संशोधकाचा दर्जा त्यांना दिला आहे. केंद्र सरकारकडूनही त्यांच्या कामाची दखल घेतली जाते. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर असताना मंजिरी यांच्या संशोधनाबाबत त्यांनी जाणून घेतलं होतं. जगातल्या तीन वैशिष्ठयपूर्ण प्रयोगशाळांपैकी एक असलेल्या सुकुबा इथल्या प्रयोगशाळेत मंजिरी काम करत असताना भारतीय राजदूतांनी तिथे खास भेट देऊन भारतीय युनिट उघडलं. पुण्यातल्या राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ शेखर मांडे यांनी त्यांच्या संशोधनाची दखल घेतली आहे. 
परभणीच्या कृषी महाविद्यालयात डॉ.हिराकांत काळपांडे व इतर प्राध्यापकांमुळे नाविन्याचा ध्यास जडला, असं मंजिरी सांगतात. कुठलीही गोष्ट अवघड नाही. आजच्या मुलींनी जगाशी स्पर्धा ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न करायला हवेत. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता कठोर परिश्रम व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्‍कीच मिळतं , असं मंजिरी सांगतात.
-बाळासाहेब काळे .

No comments:

Post a Comment