Sunday 13 May 2018

लिहिता- वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा आणि 5000 रुपये मिळवा!!

नंदुरबारमधील आदिवासी पाड्यावरची डाकणपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. केवळ दोनच शिक्षकी. इथं सुरुवातीपासूनच मुख्य प्रश्न भाषेचा होता. भिल्ल जमातीच्या बहुतांश मुलांना मराठी भाषा अवघड वाटायची. पण इथले मुख्याध्यापक सुभाष सावंत सर आणि त्यांचे सहकारी नानासाहेब बेडसे यांनी मुलांची भाषेची भीती घालवून टाकण्याचा निश्चय केला. मुलांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधून हळूहळू रोजच्या वापरातल्या मराठी शब्दांची ओळख करुन दिली.
शब्दांची आगगाडी, एका शब्दावरुन अनेक वाक्ये रचणे, शब्दपट्ट्या, चित्र- शब्द कार्डे अशा अभिनव उपक्रमांचा वापर करत हळूहळू शाळेतील मुलांना मराठी भाषेची गोडी लागली. शाळेतील बहुतेक सर्व मुलं उत्तम लिहू- वाचू लागली. केवळ दोन मुलं अभ्यासात मागे होती. त्यापैकी एक मुलगी कुपोषित, तर मुलगा अप्रगत होता. दोघांच्याही पालकांशी बोलून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची विनंती सावंत सरांनी केली. कुपोषित विद्यार्थिनीला घरी आणि शाळेतही पौष्टिक आहार मिळेल, तिला अभ्यास करायला मजा येईल असं वातावरण त्यांनी तयार केलं.




हळूहळू हे विद्यार्थीदेखील प्रगती करु लागले. तत्कालीन केंद्रप्रमुख ललिता भामरे 2014 साली एकदा शाळेला भेट द्यायला आल्या. त्यांनी अप्रगत विद्यार्थ्यांबाबत सावंत सरांकडे चौकशी केली, तर आता हे विद्यार्थीही प्रगत झाले असल्याचे सरांनी सांगितलं. भामरे मॅडम यांनी खरोखरच काही विद्यार्थ्यांचे वाचन घेतले तर प्रत्येक विद्यार्थी वयानुरुप उत्तम वाचन- लेखन करत असल्याचं त्यांना आढळून आलं. याबाबत केंद्रप्रमुख भामरे मॅडम यांनी सावंत सरांना शाबासकीही दिली.
त्यावेळी सावंत सर भामरे यांना म्हणाले, “शाळेतील विद्यार्थ्यांवर आम्ही कष्ट घेतच आहोत. पण जिल्हा परिषद शाळांबाबत सामान्य नागरिकांमध्ये खूप गैरसमज आहेत. मुलांना साधं स्वत:चं नाव लिहिता येत नाही, बेरीज वजाबाकी करता येत नाही असं लोकांना वाटतं. हा गैरसमज मिटविण्यासाठी ‘लिहिता- वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा, आणि 5000 रुपये मिळवा’ असं जाहीर आव्हान द्यावं, असं मला वाटतं” मॅडमनेही सावंत सरांची कल्पना उचलून धरली आणि 2014 साली झालेल्या केंद्रसंमेलनात हे अनोखं आव्हान इतर अनेक शिक्षकांपुढे मांडलं गेलं.




या आव्हानानंतर अनेक शिक्षक, DIECPD चे प्राध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी डाकणपाड्याच्या शाळेला भेट देऊ लागले. प्रत्येक वेळेला मुलं मात्र उत्तम वाचन- लेखन करून यशस्वी होत राहिली. त्यावेळी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी शंकरराव वळवी यांनीही शाळेला शाबासकी देऊन हा उपक्रम स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये छापून आणा, असा सल्ला दिला. आणि डाकणपाड्याची शाळा सकाळ, पुण्यनगरी सारख्या वर्तमानपत्रातून संपूर्ण नंदुरबारमध्ये कौतुकाचा विषय झाली.
सावंत सर म्हणतात, “आता अनेक शिक्षक आमची शाळा पाहायला येतात. आमची शाळा खूप श्रीमंत नाही, त्यामुळे त्यांचा खूप चांगला आदर- सत्कार आम्हांला जमेलच असे नाही. पण आमची खरी संपत्ती हे विद्यार्थी आहेत, त्यांची हुशारी पाहून प्रत्येकजण समाधानाने घरी परततो”.
एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, म्हणून सावंत सरांची धडपड आहे, त्याविषयी अधिक वाचण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/find-student-unable-read-write-win…/

No comments:

Post a Comment