Thursday 24 May 2018

लिंबाच्या झाडाखालची शिक्षणसाधना

शिरूर तालुक्यातील मातोरी गावाजवळील भालेकश्वर मंदिराचा पायथा. इथंली भिल्ल वस्ती. हा भारतातील एक मुख्य आदिवासी समूह. त्यांना भिला किंवा भिल्ल गारसिया असंही म्हटलं जातं. या समाजाची वस्ती महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान या राज्यात आढळून येते. बीड जिल्ह्यातही हा समाज विखुरलेला आहे. भालकेश्वर मंदिराच्या पायथ्याशी १३ भिल्ल कुटुंबं शासनाच्या गायरानात राहत आहेत. 



यांना रोजगाराचं ठराविक साधन नाही. उसतोडणी किंवा वीटभट्टीवर काम करून या कुटुंबांची गुजराण होते. साहजिकच आई- बाप कामावर गेल्यानंतर मुलं घरात आजी आजोबांजवळ राहतात. वस्तीच्या जवळपास शाळा नाही. मात्र, शिक्षणाची गरज वस्तीप्रमुख शहाबाई बाजीराव बरडे यांनी जाणली. आणि दोन महिने त्या आठ मुलांना घेऊन अडीच किमीवरील मातोरी जिल्हा परिषद शाळेत जात राहिल्या. परंतु वस्तीजवळ एका बाजूला तलाव आणि नदी तर दुसऱ्या बाजूला हायवे असल्याने पालकांना मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक वाटू लागलं. दुसरी ते आठवीतील ही १७ मुलांची शाळा बंद झाली. ही मुलंही वीटभट्टीवरच काम करू लागली. 



एकदा गेवराई तालुक्यातील तांदळा येथील साहेबराव पाटील विद्यालयाचे शिक्षक धर्मराज जरांगे भालकेश्वराच्या दर्शनासाठी आले. दर्शन घेऊन परतताना ही मुलं त्यांच्या नजरेसं पडली. मुलं शालेविना अशीच मोकाट फिरत आहेत हे पाहून त्यांनी पत्नी मीना यांना सांगितलं की, “तू या वस्तीवर मुलांना शिकव. ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत”. एवढ्यावरच न थांबता तिथं शाळा सुरू करण्याचा निर्णयही त्यांनी घेऊन टाकला. आता मुलांना पुन्हा एकदा शाळेची गोडी लावणं आवश्यक होतं. तेव्हा धर्मराज व मीना दोघंही आठ दिवस रोज या वस्तीवर आले. मुलांना चॉकलेट, बिस्कीट देऊन त्यांनी त्यांचे विविध खेळ घेतले. 



मीना यांचं मतीमंद या विषयात डीएड झालं आहे. मागील सहा महिन्यापासुन त्या बीडहून दररोज ये- जा करून भिल्ल वस्तीवर मुलांना शिकवतात. वस्तीवरील एका लिंबाच्या झाडाखाली हे ‘साधना ज्ञानमंदिर’ सुरु आहे. केवळ एक फळा, खडू आणि डस्टर हीच शाळेची मालमत्ता. सकाळी दहा वाजता शाळा भरते. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, कविता त्या घेत असून मुलांना अआइई मुळाक्षरांपासून पाढेही आता तोंडपाठ झाले आहेत.
३ ऑक्टोबर २०१७ मध्ये धर्मराज जरांगे यांनी ‘स्नेहग्राम’चे महेश निंबाळकर व जामखेड येथील ‘प्रयोगवन परिवार’चे सत्तार शेख यांना भिल्ल वस्तीवर आणलं. त्याच दिवशी फेसबुक लाईव्ह करून मीना जरांगे यांनी भिल्ल समाजाच्या मुलांसाठी वस्तीवर शाळेची अनौपचारीक घोषणा केली. सध्या या शाळेत अंकुश बरडे, युवराज पवार, रामेश्वर बरडे, योगेश बरडे, कार्तीक बरडे, गोविंद पवार, सुनील बरडे, लक्ष्मा बरडे, धनराज पवार, अर्चना बरडे, पायल बरडे ही मुलं शिकत आहेत. यातील १७ मुलांना जून २०१८ मध्ये मातोरी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. खरंतर ही शाळा घरापासून दूर म्हणून मुलं शाळेविना राहिली होती. आता मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी आम्ही स्कूलबसची मोफत व्यवस्था केली आहे. शाळाबाह्य झालेली मुलं पुन्हा शाळेत जात असल्याने अानंद वाटत असल्याचं धर्मराज जरांगे सांगतात.
मीना जरांगे संपर्क क्र. - 9527349777

No comments:

Post a Comment