Wednesday 9 May 2018

... आणि मलाही माझा मार्ग सापडला

नुकताच नवी उमेद पेजचा दुसरा वर्धापनदिन साजरा झाला. पेजची संपादक- समन्वयक या भूमिकेतून मी उमेदला काय दिलं यापेक्षा उमेदनी मला काय दिलं, किती समृद्ध केलं, तेच मला अधिक जाणवतं.
फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर मी आधी फक्त जुने मित्रमैत्रिणी जमवणं, एकमेकांचे फोटो बघणं, लाईक करणं इतका मर्यादितच करायचे, हे तर मी मागे लिहिलंच होतं. पण या दोन वर्षात सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग कसा करता येऊ शकतो, याचा एक चांगला अभ्यासच झाला, असं म्हणता येईल. कुठल्याही गोष्टीकडे आपण कसं, कुठल्या नजरेनं बघतो, त्यावर त्या गोष्टीचा उपयोग ठरणार असतो. काहीजण कशाची जाहिरात करायला, काहीजण केवळ असंतोष पसरवायला हे माध्यम वापरतात. आपल्याला त्यातलं नक्की काय हवं ते निवडलं की आपण सुखी, आनंदी होतो.
माझंही तेच झालं. आधी टाईमपास म्हणून फेसबुक बघणारी मी नवी उमेद पेज हँडल करायला लागल्यावर आपोआपच त्यातही चांगल्या गो्ष्टी, उपक्रम, पेजेस शोधायला लागले. अशी कित्येक वेगळं काही करणारी माणसं, निसर्गासाठी काही करणारी, एखाद्या विषयाला वाहून घेतलेली माणसं, असे ग्रुप मला इथं सापडत गेले आणि मलाही एक वेगळा मार्ग सापडला.
हे झालं माझं वैयक्तिक. पण उमेदचं काम करताना इतरही काही बदल झाले. उमेदच्या पोस्टींचं एडिटिंग करता करता मला थोडक्यात, नेमकं लिहायची सवय झाली. आता एडिटिंग अधिक चांगलं करायचा प्रयत्न करते.
आमचा कामाचा मुख्य विषय आहे, बालहक्क. आत्तापर्यंत या विषयाशी मी कधीच जोडली गेले नव्हते. तो आता कळतोय. युनिसेफ मुलांविषयक दरवर्षी एक अहवाल प्रसिद्ध करतं. ते वाचून या विषयातही किती उपविषय आणि किती काळजी करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत ते कळालं. आता मुलांचे प्रश्न, अडचणी काय असू शकतात याविषयी थोडी जागरूकता माझ्याही मनात निर्माण होऊ लागली आहे.
नवी उमेदच्या यशात, वाचकप्रियतेत खरा वाटा आहे तो जिल्हा प्रतिनिधींचा. नवी उमेदचा विशेष आहे - जनसामान्यांमधून वेगळं काम करणाऱ्या, समस्या सोडवणार्‍या, बदल घडवून आणणार्‍या व्यक्तींना शोधायचं, त्यांना पुढं आणायचं. हे नीट समजून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी. त्यानुसार सगळ्यांनीच साथ दिली. म्हणूनच, इतक्या विविध स्टोरीज पेजवर प्रसिद्ध होऊ शकल्या. त्यासाठी जिल्हा प्रतिनिधींचे मनापासून आभार.
राज्यभरात मिळून आज जवळपास 25-26 प्रतिनिधी उमेदसाठी काम करत आहेत. आता इच्छा आहे की, केवळ जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता प्रत्येक तालुक्यात नवी उमेदचा प्रतिनिधी असावा. आणि तालुक्यातून, गावांतून तिथली माहिती, स्टोरी उमेदवर प्रसिद्ध व्हावी. अधिकाधिक वाचकांपर्यंत ती पोचावी.
- वर्षा जोशी - आठवले.

No comments:

Post a Comment