Monday 28 May 2018

पूर्ण मजुरी दिली शाळेला

राज्यात ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’चा कार्यक्रम लागू झाला आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळा प्रगत होण्यासाठी धडपडू लागली. शाळा प्रगत होण्यासाठी जसे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेत सक्षम बनवायचे आहे तसेच शाळाही डिजिटल आणि देखणी बनविणे अपेक्षित आहे. पण यासाठी आर्थिक पाठबळही तसेच मजबूत हवे आणि हे तितके सोपे नाही. कारण सगळी सोंगं आणता येतात, पण पैशांचे नाही.
याच आर्थिक पाठबळासाठी महाराष्ट्रात गावांकडून लोकसहभागाची प्रथा चालू झाली आहे. धुळे जिल्ह्याने यात आणखी एक पाऊल पुढं टाकत लोकसहभागासाठी ‘प्रेरणा सभा’ घेण्याचा पायंडा पाडला आहे. धुळ्याच्या जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या (DIECPD) प्राचार्या डॉ. विद्या पाटील यांच्या या संकल्पनेने धुळे जिल्ह्यात जणू क्रांती घडविलेली आहे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 1 कोटी 51 लाख 31 हजारांची रक्कम एकट्या धुळ्यात लोकसहभागातून जमा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करणारा धुळे हा पहिला जिल्हा ठरला आहे.
या प्रेरणा सभांची सुरुवात मार्च 2016 पासून झाली. पाटील मॅडम सांगतात, “शाळा आणि पालक यांच्यातला औपचारिक बंध गळून पडावा आणि गावानेही शाळेच्या विकासात रस घ्यावा, म्हणून नियोजित पद्धतीने लोकसहभाग जमा करण्यासाठी ही प्रेरणा सभांची कल्पना सुचली.” सभा शक्यतो सकाळी सातच्या सुमारास किंवा संध्याकाळी सातच्या सुमारास आयोजित केल्या जातात. जेणेकरुन गावातल्या शेतकरी किंवा कामगार ग्रामस्थांचे कामाचे तास वाया जाऊ नयेत.
ही सभा होण्यापूर्वी आठवडाभर शिक्षक घरोघरी जाऊन या सभेची माहिती देतात आणि पालकांना निमंत्रण देतात. या सभा अनौपचारिक वातावरणात होतात. सभेत शक्यतो कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर स्थान दिलं जात नाही. सभेसाठी मंडप, टेबल- खुर्ची, पुष्पगुच्छ, आदर- सत्कार या गोष्टींना फाटा दिला जातो. टेबल- खुर्ची असेल तर ठीकच नाहीतर थेट गावकऱ्यामध्ये बसून ही सभा होते.
डॉ. विद्या सांगतात, “आर्थिक मदत प्रत्येक ग्रामस्थाला शक्य असेल असं नाही, त्यामुळे आमचा भर केवळ आर्थिक मदतीवर नसतो. बरेचदा आम्ही गावकऱ्यांना आवाहन करतो की तुमच्या शेतात पिकलेली ज्वारी, बाजरी, मका किंवा ताज्या भाज्या एखाद्या आठवड्यात शाळेला पोषण आहारासाठी द्या. सुतार, लोहार, कुंभार अशा कारागिरांनी त्यांचे कौशल्य आणि व्यवसायाची माहिती शाळेला सांगावी. महिलांनी मुलांसाठी पोषण आहार तयार करायला मदत करावी किंवा एखादीला चांगली रांगोळी काढता येत असेल, तर ती मुलांना शिकवावी, कुणी बागकाम शिकवावं. जेणेकरुन पालकांचा शाळेतील आणि मुलांच्या शिक्षणातील रस कायम राहावा.”
त्या पुढं म्हणतात, “धुळे हा काही तसा संपन्न जिल्हा नाही. पण आमच्या प्रेरणा सभेच्या उपक्रमाला धुळेवासियांनी भरभरुन साथ दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बाळदे या गावी आमची प्रेरणा सभा सुरू होती. संध्याकाळी चालू असलेल्या या सभेतील भाषण मजुरीवरून घरी जाणाऱ्या रांजण भिल्ल याच्या कानावर पडलं. त्याने सायकलवरुन उतरून ती सभा ऐकली आणि त्या दिवशी मिळालेली 200 रुपयांची पूर्ण मजुरी शाळेला दिली, हा प्रसंग तर मी विसरूच शकत नाही.”

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

No comments:

Post a Comment