Friday 11 May 2018

वाहनचालक ते लेफ्टनंट

शहर पुणे. इथं वाहन चालक म्हणून नोकरी करणारा ओम उत्तमराव पैठणे. मूळचा बीड जिल्ह्यातील लिंबारूई गावचा तरुण. एक दिवस, निवृत्त कर्नल बक्षी त्याच्या कारमध्ये प्रवासी म्हणून बसले. आणि या प्रवासात त्यांनी ओमच्या जीवनालाच दिशा मिळवून दिली.
सेवानिवृत्त कर्नल बक्षी यांनी ओमशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘संयुक्त लष्करी सेवा’ (कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) ‘सीडीएस’ परीक्षेबद्दल माहिती दिली. लेफ्टनंट कर्नल गणेश बाबू यांचा पत्ता देऊन त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही दिला. पुढे २०१६ मध्ये झालेल्या ‘सीडीएस’ परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात ओम उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने भोपाळ येथे ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’ (एसएसबी)ची परीक्षा उत्तीर्ण होऊन चेन्नईमध्ये “ओटीए’मधून प्रशिक्षण पूर्ण केले. आणि तो भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर १० मार्च २०१८ रोजी रूजू झाला. 
ओमच्या यशामागे निवृत्त कर्नल बक्षी यांचा योग्य सल्ला आहे, त्याचे स्वतःचे आणि त्याच्या आई-वडीलांचे - उत्तम आणि सुशिला यांचे कष्टही आहेत. मनकर्णिका प्रकल्पात बीड तालुक्यातील लिंबारूई हे गाव विस्थापित झालं. त्यातच दुष्काळामुळे उत्तम यांना चार एकर शेती कशी करायची हा प्रश्न पडला. मुलांचं शिक्षण कसं होणार या चिंतेत त्यांनी १९८६ मध्ये गाव सोडून रोजगारासाठी पुण्याची वाट धरली. आवश्यक असलेल्या कागदपत्रांअभावी त्यांच्या तीनही मुलांना पुण्यातील बँकाकडून शिक्षणासाठी कर्ज मिळालं नाही. शेवटी ते गावी परत आले आणि खाजगी सावकाराकडून ५० हजाराचं कर्ज घेतलं. तर सुशीला यांनी स्वतःचे दागिने विकून तीनही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. पुण्याजवळ सारोळ्यालगत तोंडल गावात स्थाईक झाल्यानंतर उत्तम यांनी सुरूवातीला एका कुक्कुटपालन व्यवसायाच्या गाडीवर आणि पुढे पुण्याच्या व्यंकटेश्वरा कंपनीत २२ वर्ष वाहनचालक म्हणून काम केलं. वाहन चालवतांना त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना इजा झाल्यामुळे गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातली एकच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सुशीला यांनीही मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावला. ओमचा धाकटा भाऊ आदिनाथ याचं बीएसस्सी झालं आहे. तर बहिण मोनिका पदवीशिक्षण घेत आहे.
ओमची आई म्हणते, “गाव सोडले तेव्हा आमची परिस्थिती बिकट होती. घरात ओमला एकटे ठेवून मला शेतात मजुरीच्या कामासाठी जावं लागायचं. मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही खूप कष्ट उचलले. त्यातूनही मुलं घडली, हा आनंद आहे”.
लिंबारूई गावात सध्या या कुटुंबाचं पत्र्याचं घर होतं. तेही दोन वर्षापूर्वी पावसात पडलं आहे. तरीही गावातील गरीब मुलांसाठी शाळा उघडण्याचं ओमचं स्वप्न आहे. वाहनचालक ते लेफ्टनंट असा त्याचा खडतर प्रवास आजच्या तरूणांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
- दिनेश लिंबेकर,.

No comments:

Post a Comment