एकुलती एक
गुणी मुलगी कविता. तिला रक्ताचा कर्करोग झालेला. तिचं कोमात जाणं. महिनोन्
महिने चालणारे उपचार. या मुलीचा बाप डॉ शंभुनाथ कहाळेकर, तंत्रग्राम
संकल्पनेचे जनक. विज्ञानप्रसारक म्हणून सर्वपरिचित झालेले. त्यांच्या
लेकीचा आजार सुरू झाला १९९२ साली. ती आजारातून बरीही झाली. तेव्हा तिचं
लग्न झालं. शंभुनाथांना नातही झाली. पण नंतर कविताचा आजार बळावला. या सर्व
काळात या दुःखी, व्यथित बापाने मन गुंतवण्यासाठी विज्ञानप्रसाराचा मार्ग
शोधला.गेल्या २५ वर्षात विज्ञानरंजनाचे तीन हजार प्रयोग,
पाचपाचशे घरं
असलेली, निवघा बाजार आणि चीमेगाव ही त्यांनी केलेली नांदेड जिल्ह्यातली
तन्त्रग्रामं. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना 20 लाखाचा निधी
दिला. या कामात त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी, आमदार डी.पी
सावंत यांचं मोलाचं सहकार्य झालं. इथे महिलांना पाचशे रुपये भांडवलावर
निर्धूर चूल बनविण्याचं तंत्र शिकविण्यात आलं. त्यावर या महिलांची
पोटापुरती कमाई होते. महिलांना कचऱ्यापासून कोळसा बनविण्याची यंत्रंदेखील
देण्यात आली आहेत. तंत्रज्ञानाधारित असे शंभर उद्योग करायला कहाळेकर
मार्गदर्शन करतात. कहाळा गावी जन्मलेले डॉ शंभुनाथ कहाळेकर. १९७७ मध्ये आयआयटी, खरगपूरहून एमटेक पदवी, टाटा कन्सल्टिंगमध्ये काही वर्ष नोकरी, १९८७ पासून नांदेडच्या एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकी, पीएचडी मार्गदर्शक, मराठी विज्ञान परिषदेचे सक्रीय सदस्य, आहेत. विज्ञानप्रसाराच्या कार्यासाठी आणि पुस्तकलेखनासाठी पुरस्कार ही त्यांची ओळख. कहाळेकरांची मुलगी कविता आज हयात नाही. २०१७ मध्ये ३६व्या वर्षीच तिचं निधन झालं. नात कीर्ती आणि पत्नी सुनीता यांच्या मदतीने ते दुःखातून बाहेर पडत आहेत. आज वयाच्या ६६ व्या वर्षीही विज्ञान तंत्रज्ञानप्रसाराचं त्यांचं कार्य सातत्याने सुरूच आहे.
- सु.मा. कुळकर्णी.

No comments:
Post a Comment