Monday 19 March 2018

एक मूठ धान्य...

‘मैत्र मांदियाळी’ हा जालना शहरातील समाजोपयोगी उपक्रम आयोजणारा ग्रुप. ग्रुपची मदतीविषयी चर्चा चालायची, मदत कशी जमवायची याविषयी चर्चा चालायची, तेव्हा हे सगळं ग्रुपमधील काहींची लहान मुलंही ऐकायची. आपला चांगुलपणा, आपणही समाजाला काही देणं लागतो, त्यासाठी संघटीत होणं गरजेचं आह, हे सगळं या लहानग्यांचा मनात झिरपलं. आपणही काहीतरी करायला हवं, हे मुलांनी ठरवलं. पुन्हा एकदा मोठी मंडळी एकत्र जमली आणि त्याचं दिवशी बच्चेकंपनी शहरातील वृंदावन कॉलनी भागात जमली. 8 ते 14 वयोगटातील ही मुलं. प्रत्येकानं कॉलनीत फिरून मूठभर धान्य, एक वही, एक पेन आणि एक वस्तू जमा करायला सुरुवात केली. आदित्य किंगरे, नेहा, निकिता, कृष्णा, रुद्राक्ष, समीक्षा, ऋग्वेद मोहरीर, वैष्णवी, वीरेंद्र पाटील, शौनक कुलकर्णी अशी ही लहानगी. ही ‘ज्युनिअर मैत्र मांदियाळी’ आता सुट्टीच्या दिवशी सर्वजण एकत्र येते. भाग्यनगर, शिवनगर या भागातून त्यांनी ही मोहीम काढली. आणि चिल्लीपिल्ली गॅंगने गहू 125 किलो, तांदुळ 15 किलो, तूरडाळ 1 किलो, 2 साबण जमा केले आहेत.
‘एक अंधार संपला की दुसऱ्या अंधाराचा शोध घ्या आणि तिथे प्रकाश निर्माण करून नव्या अंधाराचा शोध घ्या.’ बाबा आमटे यांचं हे वाक्य. हेच मनात धरून जालना शहरातील मैत्र मांदियाळी हा ग्रुप काम करतो आहे. विशेष म्हणजे मुलांना ‘हे करा, ते करा’ असं न सांगताही प्रत्यक्ष कृतीतून याच वाटेवर आणलं आहे.
मैत्र मांदियाळी ग्रुप मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतो, शैक्षणिक साहित्य, शाळा-कॉलेजची फी, हॉस्टेलचा खर्च ते कपड्यांपर्यंत मदत करीत आहे. ग्रुपमधील सदस्य अजय किंगरे यांच्यासह इतरही सदस्यांच्या घरी सहकुटुंब जमतात, चर्चा होतात, गरजू व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवण्याची योजना आखतात. हेच सगळं मुलांच्या कानावर पडत गेलं.
नुकतंच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे ही लहान मंडळी गेली असता ‘मोबाईलमधून बाहेर पडून तुम्ही हे चांगलं काम करत आहात’ अशी शाब्बासकी देत त्यांनी मुलांचं कौतुक केलं. आणि 100 किलो गहू दिला. या गँगच्या पाठीवर पडलेली ही शाब्बासकीची पहिली थाप!
या लहानग्यांनी आतापर्यंत एकूण 285 किलो गहू,115 किलो तांदूळ, 7 किलो तूरडाळ, 3 किलो मीठ, 8 पेन, 7 वह्या, 14 साबण आणि 5 शाम्पू पुड्या जमा केल्या आहेत. मदत जमा करण्याचे हे कार्य अजूनही चालू आहेच.
मैत्र मांदियाळीने एवढंच केलं की, प्रत्येक कार्यक्रमात मुलांना सोबत घेतलं. त्यांना ‘प्रश्नचिन्ह’ या फासेपारधी समाजाच्या मुलांच्या शाळेत व ‘शांतीवन’ अनाथालयात शिबिरात पाठवलं आणि हेमलकसा येथेही नेलं.
आता ही मुलं पूर्ण जालना शहरातील घराघरात जाणार आहेत. हे सर्व धान्य ‘प्रश्नचिन्ह’ या फासेपारधी समाजाच्या मुलांच्या शाळेला पाठवणार आहेत.
मुलं मोठ्यांचं अनुकरण करतातच. मोबाईलच्या विश्वात रमण्याच्या या काळात मोठ्यांच्या सामाजकार्याचं अनुकरण ही लहानगी करू लागलीत हे विशेष. 

 - अनंत साळी.

No comments:

Post a Comment