Thursday 22 March 2018

मरण सोपं, विधी अवघड, ३३ वर्षात १,४४२ जणांवर अंत्यसंस्कार

वाढत्या शहरीकरणाच्या प्रभावाने असेल, संकटकाळात धावून जाणाऱ्यांची, अंत्यसंस्कारात सहभागी होणार्‍यांची संख्या घटत असल्याचं दिसून येतं. अंत्यविधीची रीतही अनेकांना ज्ञात नाही. ‘मरणं सोपं, विधी अवघड’ अशी म्हण त्यावरून रूढ होत असावी. उस्मानाबादमध्ये मात्र अशा वेळेसाठी बाळासाहेब गोरे लोकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एखाद्या दुर्घटनेत जखमी व्यक्तीचे मोबाईलमध्ये फोटो घेणारे शेकडो आढळतात. मात्र मदतीसाठी पुढं येणारे विरळाच. मृतदेहाला स्पर्श न करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रिवाजानुसार अंत्यसंस्कारांचं ज्ञान असणाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे विधीसाठी अडथळे येतात. हा अडथळा दूर करायचं काम बाळासाहेब वसंतराव गोरे यांनी सुरु केलं आहे. उस्मानाबाद नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात ते कर्मचारी म्हणून काम करतात. अंत्यसंस्काराच्या विधींना पुण्यकर्म मानत १९८४ पासून त्यांनी हे काम सुरु केलं. आज शहरात, कुठल्याही कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर नातेवाईक त्यांना फोन करतात. वेळ कुठलीही असो, बाळासाहेब घराबाहेर पडतात आणि पुण्यकर्मासाठी त्यांची धडपड सुरू होते. अंत्यविधीसाठी, तिसऱ्याच्या विधीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी त्यांना तोंडपाठ असते. त्या त्या कुटुंबातल्या नातेवाइकाला सोबत घेऊन ते बाजारपेठ गाठतात. जाळण्यासाठी इंधन, तिसऱ्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ते ठिकाणी पोहाेचतात. त्यांची ही सेवा शहरातल्या प्रतिष्ठितांपासून सामान्य कुटुंबांपर्यंत आहे. केवळ हिंदू नव्हे, तर ख्रिश्चन धर्मातल्या व्यक्तींवरही त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. आजवर ३३ वर्षात त्यांनी १,४४२ व्यक्तींचे अंत्यविधी केले आहेत.
तांबरी भागात त्यांचं घर आहे. जवळचं राहणाऱ्या उत्तमराव नलावडे यांना हे अंत्यसंस्काराचं काम करताना त्यांनी अनेकदा पाहिलं. आणि तेच त्यांच्या मनात घर करून राहिलं. त्यांचं हे काम बघूनच “मलाही अंत्यसंस्कारासाठी लोकांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली,’’ असं बाळासाहेब सांगतात
पूर्वाश्रमीचे खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू ही, त्यांची आणखी एक ओळख. १९७४ साली त्यांनी दहावीत असताना भोपाळला पहिली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा जिंकली होती. त्याबद्दल त्यांना तीन वर्षे शिष्यवृत्ती मिळाली. खेळातून शिष्यवृत्ती मिळविणारे बाळासाहेब जिल्ह्यातले पहिले खेळाडू आहेत. अडचणीच्या काळात धावून जाणारे बाळासाहेब गोरे यांच्या या सेवेचा उस्मानाबादकरांना हेवा वाटतो.

- चंद्रसेन देशमुख .

No comments:

Post a Comment