रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमेचा सण आपल्याकडे पारंपरिक उत्साहात साजरा
होता. यामध्ये बहीण- भावाला राखी बांधते, औक्षण करते, गोड- धोड मिठाई खाऊ
घालते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेट देतो, शिवाय आयुष्यभर
तिचे रक्षण करण्याचे वचनही देतो. पण आजच्या बदलत्या काळानुसार फक्त
पुरूषांनी बायकांचे संरक्षण करावे, अशी परिस्थिती आता राहिली नाही.
देशाच्या संरक्षणमंत्रीपदी एक स्त्री असताना, स्त्रिया कोणत्याच क्षेत्रात
मागे नाहीत
. उलट बऱ्याचदा अचानक आलेल्या
संकटाला अगदी सामान्य स्त्रीसुद्धा जास्त धीराने तोंड देते, हे आपण पाहतो.
मग त्याही पुरूषांचे संरक्षण करू शकतातच की!“अगदी हाच विचार डोक्यात
ठेवून गेल्या काही वर्षांपासून आम्ही लातूर तालुक्यात ‘कन्या सुरक्षा कवच’
अंतर्गत एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे आमच्या जिल्हा
परिषद शाळेत एक वेगळी राखीपौर्णिमा साजरी होते. या रक्षाबंधनात मुली तर
मुलांना राख्या बांधतातच पण मुलगेही मुलींना राख्या बांधतात. शिक्षक-
शिक्षिका एकमेकांना राख्या बांधतात, मी जर एखाद्या शाळेला भेट दिली तर
शिक्षक मलाही राख्या बांधतात, मी देखिल त्यांना राख्या बांधते. आपण सगळेजण
एकमेकांना सांभाळूया, आनंदाने एकत्र राहूया आणि एकमेकांचे संरक्षण करूया
असा संदेश आम्ही या राखीपौर्णिमेतून देतो.” लातूरच्या गटशिक्षणाधिकारी मा.
तृप्ती अंधारे सांगत होत्या.2017 सालीही अंधारे मॅडम यांनी लातूर
तालुक्यातील हरंगूळ आणि जेवळीच्या जिल्हा परिषद शाळांत ही अनोखी
राखीपौर्णिमा साजरी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शाळेतील मुला- मुलींनी
एकमेकांना राख्या बांधल्या. काही विद्यार्थ्यांनी तर शिक्षक –
शिक्षिकांनाही राख्या बांधल्या. शिक्षक- शिक्षिकांनी एकमेकांना राख्या
बांधल्या. शिवाय शिक्षकांनी अंधारे मॅडम यांना आणि अंधारे मॅडम यांनी
शिक्षकांनाही राख्या बांधल्या. आनंदाची बाब म्हणजे या कार्यक्रमात शालेय
व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि इतर ग्रामस्थही सहभागी झाले
होते. लातूर तालुक्यात सर्वत्रच या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले गेले.
माटेफळच्या जिल्हापरिषद शाळेत तर मुख्याध्यापक पवार यांनी आधी सर्व सहकारी
शिक्षिकांना राख्या बांधल्या.
नेहमी भावाला राखी बांधणाऱ्या मुली आज
आपल्या हातावरची राखी पाहून खुष झाल्या होत्या. समानतेचे आगळे रक्षाबंधन
साजरे करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या अंधारे मॅडम म्हणाल्या “खरंतर राखीचा
धागा फक्त निमित्त आहे. त्यानिमित्ताने आपणही कुणीतरी आहोत, आपल्याकडे ताकद
आहे हा आत्मविश्वास मुलींमधे निर्माण होणे मला फार महत्त्वाचे वाटते.
आपल्या संरक्षणासाठी आपण केवळ पुरूषांवर अवलंबून राहणे भ्याडपणाचे आहे, हे
आम्ही मुलींना ‘कन्या सुरक्षा कवच’ उपक्रमातून शिकवतोच आहोत. त्यासाठी
कराटे, तायक्वांदोसारख्या आत्मसंरक्षणाच्या कलाही त्यांना शिकवितो आहोत.
आपण आपले संरक्षण करण्याइतके मजबूत झालेच पाहिजे, हे वारंवार मुलींच्या
मनावर बिंबविण्यासाठी हे रक्षाबंधनाचे निमित्त!”
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर
No comments:
Post a Comment