खरंतर आमचं कोकण म्हणजे आंबा- काजू- फणस अशा घनदाट झाडांचं आगरच. पण गेल्या काही वर्षांपासून शहरीकरणाच्या नादात कोकणातही बेसुमार वृक्षतोडीचं पेव फुटलं आहे. याच वेगानं झाडं तोडली जाऊ लागली तर एकेकाळचं समृद्ध कोकण दुष्काळग्रस्त व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून झाडं तोडणाऱ्याला शक्य तितका विरोध करा, पण ते शक्य नसेल तर वैयक्तिक पातळीवर घराच्या आवारात किमान दोन तरी मोठी झाडं लावा, असं आवाहन मी विद्यार्थ्यांना केलं. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी नारळ, पोफळी, आंबा, फणस, काजू, साग इ. वृक्षांची रोपं लावली आहेत. या शिवाय आम्ही बीजबँकेचा एक उपक्रमही केलेला आहे. त्यात उन्हाळ्याच्या सुटीत मुलांनी गोळा केलेल्या आंबा, फणस, जांभूळ, बोर, लिंबू यांच्या बिया पाऊस सुरू झाला की गावाला जाताना एसटीतून रस्त्याच्या कडेला मुलं बिया फेकतात.
निसर्गात रमणं कोणाला आवडत नाही?! विद्यार्थ्यांनाही निसर्गपर्यटनाची गोडी लावण्यासाठी आमच्या शाळेतर्फे दरवर्षी वर्षा सहलीचं आयोजन केलं जातं. आमच्या वरवडे गावाजवळच जानवली आणि गड या नद्यांचा संगम आहे. संगमाकडे जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता आहे, पण आम्ही मुद्दाम झाडाझुडूपांमधून पायवाटेने नेतो. गावाच्या जवळच 2-3 किमीवर हा संगम आहे. या वर्षासहलीत गावातले जुने जाणते, वृद्ध लोकही सोबत घेतो. जंगल म्हणावं इतकी दाट झाडी या वाटेवर आहे. जंगलातून जाताना साग, हिरडा, बेहडा, मोह अशा नानाविध झाडांची आणि भारद्वाज, वेडा राघू, कोतवाल, नाचण, धनेश अशा पक्ष्यांची ओळख आम्ही मुलांना करून देतो. सगळ्यात शेवटी संगमावर जाऊन शिक्षकांच्या देखरेखीखाली मुले पाण्यात मनसोक्त खेळतात आणि घरून आणलेला डबा खाऊन सहलीची सांगता होते.
पर्यावरण संवर्धनाचा आमचा आणखी एक अनोखा उपक्रम म्हणजे रानभाज्यांची ओळख. कोकणात पावसाळ्यात वेगवेगळ्या रानभाज्या उगवतात. आरोग्यासाठी त्या त्याच मोसमात खायलाही हव्यात, पण नव्या पिढीला त्यांची नावेही माहिती नाहीत. आमच्या शाळेजवळच्या रस्त्यावर घाडीआज्जी दर पावसाळ्यात या बहुमोलाच्या रानभाज्या विकतात. त्यांना मी एकदा शाळेत यायचं निमंत्रण दिलं आणि त्यांचा सन्मान करून मुलांना रानभाज्या, त्यांची नावं आणि उपयोग यांची माहिती द्यायला लावली. घाडी आज्जींनी भारंगी, टाकळा, कुर्डू या रानभाज्यांची तसेच कुडाच्या शेंगा, शेवग्याचा पाला यांच्या औषधी उपयोगाची ओळख करून दिली. वेगवेगळ्या व्याधींवर या भाज्या कशा उपयोगी आहेत हे सांगितलं. प्रत्येक ऋतुनुसार खानपान ठेवले आणि पुरेशी मेहनत केली तर आरोग्य चांगले राहते, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणावरून पटविलं.
- ऋजुता चव्हाण.
No comments:
Post a Comment