अश्विनी कमलाकर हंचाटे. लातूर महानगरपालिकेच्या मंठाळे नगरातील शाळा क्रमांक नऊची ती विद्यार्थिनी. वडील पोटाच्या विकाराने त्रस्त. त्यातच त्यांचं निधन झालं. आईचाही आधार सुटलेला. अश्विनीसह तिच्या दोन भावडांच्या पायाखालची वाळू सरकली. मदतीला कोणी नाही आणि जवळेचेही दूर गेले. तरीही एकमेकांना आधार देत या भावंडांनी कंबर कसली. ताईचं शिक्षण व्हावं आणि पोटाला भाकर मिळावी म्हणून भावंडे हाती पडेल ते काम करु लागली. आणि चूल पेटती राहिली. सर्वांचा स्वयंपाक, धुणी-भांडी, झाडलोट यात अश्विनीही थकून जायची. तरीही दररोज पाच तास अभ्यास करायचाच हे तिनं ठरवलं. आणि तसं करूही लागली. तिची जिद्द पाहून शिक्षकही तिच्या मदतीसाठी पुढं आले. त्यांनी शाळेत अभ्यासिका उपलब्ध करुन दिली. वहया–पुस्तकांचाही खर्च उचलला. कष्टाचं चीज झालं. अन दहावीच्या परीक्षेत तिला ९४ टक्के गुण मिळाले.
अश्विनी सांगते, “मनोबल वाढेल अशी आपुलकी गुरुजनांनी दिली. यामुळे मला बळ आलं. शिक्षकांचं मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे हे यश मिळवता आलं.” हे म्हणतानाही तिच्या डोळ्यात पाणी दाटून येतं.
अश्विनीच्या जिद्दीची गोष्ट मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांनी ऐकली. त्यांनी तिला त्यांच्या घरी बोलावून घेतलं. तिचं कौतुक केलं. आता अश्विनीला डॉक्टर व्हायचं आहे. आणि तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारीही दिवेगावकर यांनी घेतली आहे.
अश्विनीच्या जिद्दीची गोष्ट मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरांनी ऐकली. त्यांनी तिला त्यांच्या घरी बोलावून घेतलं. तिचं कौतुक केलं. आता अश्विनीला डॉक्टर व्हायचं आहे. आणि तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारीही दिवेगावकर यांनी घेतली आहे.
- प्राजक्ता जाधव.
No comments:
Post a Comment