Tuesday 17 July 2018

रिजवाना: रत्नागिरीतील पहिली महिला पीएसआय


शासकीय अधिकारी व्हावं, असं रिजवानाला शाळेत असल्यापासूनच वाटत असे. रिजवाना लालसाब ककेरी. आज रत्नागिरीतील पहिली महिला पीएसआय अधिकारी म्हणून तिने ओळख निर्माण केली आहे.
रत्नागिरी शहरापासून जवळच असणाऱया एमआयडीसी झाडगांव परिसरात राहायला, घरची परिस्थिती बेताची, आईवडिलांनी दररोज मेहनत केल्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. ''आईवडील अशिक्षित. मात्र मुलांनी भरपूर शिकावं म्हणून दिवसरात्र मेहनत घेणारे. गेल्या चार वर्षांपासून परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी आहे. भाऊ सनट्रिंग काम करतो, त्याचा मोठा हातभार घराला लागतो. आई फिरून कपडे विकण्याचा व्यवसाय करते. बाबा पानपट्टी चालवतात '' रिजवाना सांगत होती.
ती शाळेत असताना वडील ठेकेदाराकडे कामाला होते. मात्र अशा काही अडचणी निर्माण झाल्या की वडिलांना घरीच राहावं लागलं. तिची शाळा गोदूताई जांभेकर विद्यालय. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांची मदत झाल्याचं सांगते. मैदानी खेळात पारंगत असलेली रिजवाना राष्ट्रीय स्तरावरील धावपटूही आहे.
चार वर्षांपूर्वी तिनं एमपीएससी अभ्यास सुरू केला. दिवसाला १०-१२ तास अभ्यास. स्पर्धा परीक्षेच्या १०० ते १५० पुस्तकांचं वाचन. शिक्षणाधिकारी एस.जे.मुरकुटे यांना ती यशाचं श्रेय देते. याखेरीज खो-खोचे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांनी नेहमीच मोलाचं सहकार्य, स्फूर्ती दिल्याचं रिजवाना सांगते.
महाविद्यालयीन शिक्षण गो.जो.महाविद्यालय. बीए झाल्यानंतर रिजवानानं एलएलबीची पदवी घेतली . कायदेशिक्षण पूर्ण करणारी पोलीस निरीक्षक म्हणून रिजवानाकडे पाहिलं जाणार आहे. कोकणातल्या मुलांचा स्पर्धापरीक्षा देण्याचा कल तुलनेनं कमी आहे. रिजवानाच्या यशानं इतर विद्यार्थीसुध्दा स्पर्धा परीक्षेकडे वळतील अशा प्रतिकिया जिल्ह्यातील नामवंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 -जान्हवी पाटील

No comments:

Post a Comment