Tuesday 10 July 2018

गेल्या ११ वर्षात सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्गदर्शनाचा फायदा. तीन हजारांहून अधिक तरुणांना २१व्या वर्षीच नोकरी

2013-14 चा सुमार. एम.एड पूर्ण झालं होतं. नेट-सेट पास झालो होतो. तरी नोकरी मिळत नव्हती. घरची गरिबी. वडील लहानपणीच वारले होते. घरात आई, 3 भाऊ न बहीण. खूप निराश होतो, पण शांतपणे विचार करत गेलो न मार्ग सापडला. त्यावेळी वाटलं, वेळीच कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं असतं तर.... आजूबाजूला माझ्यासारखे अनेक होते. सोलापूर विद्यापीठात एमएड करत असताना प्रमोद कारंडे यांच्याशी मैत्री झाली होती. प्रमोदच्या घरची स्थितीही माझ्यासारखीच. दिवसभर काम आणि रात्री शिक्षण. वर्ष २००६ मध्ये छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात प्रवेश. स्वतः अनंत अडचणी भोगल्यामुळे त्यांनाही बरोबरीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणीचीही जाणीव.
साधा स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा, तो कुठे जमा करायचा, हेही काही विद्यार्थ्यांना समजायचं नाही. वर्षभराची स्कॉलरशिप जायची. त्यामुळे दरिद्रयात आणखीनच भर. कॉलेज सोडावं लागायचं. प्रमोद यांनी या विदयार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आम्ही समविचारी मित्र एकत्र आलोे. डिसेंबर 2006 मध्ये श्री साईनाथ बहुउद्देशीय संस्थेची स्थापना झाली. गेल्या ११ वर्षात सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्गदर्शनाचा फायदा, तीन हजारांहून अधिक तरुणांना २१व्या वर्षीच नोकरी, हे घडलं. मीही या संस्थेबरोबर काम करू लागलो. शैक्षणिक सवलती मिळवून देणं, शिकत असताना काम करून पैसे कमावण्याची सवय लावणं, त्यांचं मनोधैर्य वाढवून शिक्षणाची जिद्द निर्माण करणं ... हे काम आता फक्त रात्र महाविद्यालयातल्या मुलांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. वंचित, अपंग, गरीब मुलांसाठी १०-१२वी परीक्षांसाठी मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, स्पर्धापरीक्षा प्रोत्साहन मार्गदर्शन, रेल्वे भर्ती, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी मोफत मार्गदर्शन. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनातून ५० हून अधिक मुलांना विविध खात्यात नोकरी मिळाली.
प्रमोद कारंडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी पेशानं शिक्षक. कारंडे सर सध्या बालकामगार प्रकल्प इथं बालकामगार मुलांना शिकवतात. त्याचबरोबर विडी कामगार, वीट कामगार, घरकाम करणार्‍या महिलांना त्यांच्यासाठीच्या सरकारी योजनांची माहिती देतात. गणेश माने, श्रीकांत सायबोळ, शिवाजी नलवडे, अतुल यादव, अतुल सोनके, रवी चव्हाण, दिनेश बंडगर संस्थेचे खंदे सदस्य. कार्याचा खर्च सदस्य स्वतःच्या मिळकतीतूनच करतात. संस्थेचं काम पाहून अनेक नागरिकांनी संस्थेला साहाय्य दिलं आहे. पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे करण्याची पद्धतही आगळी. गेल्या वर्षी सचिव गणेश माने यांच्या वाढदिवसानिमित पोतराजाची दोन मुलं दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च संस्थेनं उचलला. खरंच, उत्तीर्ण मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद लाखो रुपयांपेक्षा जास्त मोलाचा वाटतो.
- तय्यब शेख.

No comments:

Post a Comment