Tuesday 24 July 2018

विठ्ठलनाम मुखाने घेऊया ... रोपे लावीत पंढरीसी जाऊया...

आषाढी एकादशीनिमित पंढरपुरात येणा-या वेगवेगळ्या दिंडया. त्यातली वेगळी दिंडी, वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांची. दिंडीत टाळ-मृदंगाएेवजी टिकाव-फावडे. वृक्षदिंडीत दोन टेम्पो. एकात शंभर महिला, तर दुसऱ्यात दहा पुरुष वारकरी, जेवणाचं साहित्य, रोपे. वाटेत कुठेही वारकरी झाडे लावतात. ज्या गावात दिंडी थांबते, तिथलं मंदिर वारकरी स्वच्छ करतात. त्यानंतर मंदिरात तुळस, ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे मंदिरासमोर वड, उंबर, बेलाची झाड लावणं. विविध प्रकाराची एक हजार रोपं वाटून श्रमदान. संध्याकाळी वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचं मुलीला शिकवा -सक्षम बनवा, व्यसनमुक्ती, जलसंधारण अशा सामाजिक या विषयावर प्रवचन.
देशमुख बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या ममदापूर पाटोदा गावातले. ३५ वर्षांपासून ते पर्यावरणावर काम करत असून वृक्षलागवडीची त्यांना लहानपणापासून आवड. आजपर्यंत जवळपास पाच लाख लोकांना मोफत वृक्ष. २००८ मध्ये संत तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जयंतीचं औचित्य साधून त्यांनी ममदापुर पाटोदा ते पंढरपूर वृक्षदिंडी सुरू केली. 
प्रस्थानाच्या दिवशी गावात रोपांची मिरवणूक काढली जाते. बीड, नगर, शिर्डी, देहू , आळंदी , सासवड, नारायणपूर ,जेजुरी, शिखर शिंगणापूर मार्गे वाखरीत. तिथल्या विठ्ठल कारखान्यावर दिंडीचा मुक्काम. वाखरीत येणाऱ्या सर्व पालख्यांचं दर्शन घेऊन वारकऱ्यांना विचारून रोपं आणि शेवगा, हादगा, कारले, दोडके,भोपळे, गवार, भेंडीच्या बिया भेट दिल्या जातात. पुढे पंढरपूरला बाेधले महाराजांच्या मठात दिंडी विसावते. मग नामदेव पायरीचं दर्शन घेत वारकऱ्यांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून रोपांची भेट.
दिंडीत सुधाकर यांच्या पत्नी मोहिनी तसंच मुलं सुमोद आणि सृष्टीही सहभागी होतात. 
-दिनेश लिंबेकर .

No comments:

Post a Comment