Saturday 21 July 2018

बीडचा जरेवाडी पॅटर्न!- भाग एक

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका. या शाळेतील संदीप पवार सरांना ‘आदर्श शिक्षकाचा राष्ट्रपती पुरस्कार’ मिळालेला आहे. म्हणूनच शाळा पाहण्याची देखील उत्सुकता होती. आम्ही जरेवाडी शाळेत पोहोचलो. शाळेच्या आजूबाजूच्या टेकड्या एवढ्या हिरव्यागार आहेत की शाळा म्हणजे एखाद्या हिल स्टेशनवरचं हॉटेलच वाटलं.
विद्यार्थ्यांनी आमचं फुलं देऊन स्वागत केलं. तेवढ्यात एक सहावीतील चुणचुणीत विद्यार्थिनी पुढे आली आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाली, 'जरेवाडी जिल्हा परिषद शाळेत आपले हार्दिक स्वागत. मी तुमची गाईड, मी तुम्हांला संपूर्ण शाळा दाखविणार आहे.' शाळा दाखविण्यासाठी विद्यार्थी गाईड!! या संकल्पनेला दाद देत आम्ही तिच्या मागे चालू लागलो.
सर्वात प्रथम शाळेचे भलेमोठे आवार, तिथं छानसं व्यासपीठ. मग काही पायऱ्या चढून गेलो की ज्ञानरचनावादी साहित्याने सजलेल्या वर्गखोल्या, कलादालन, विद्यार्थी बचत बँक, विज्ञान प्रयोगशाळा आणि तिथून जवळच पोषण आहार शिजविण्यासाठी स्वयंपाकघर. तिथून पुढे 'मीना राजू मंचा'च्या शिवी बंद अभियानाची शपथ लिहिलेली होती. आम्हांला ती विद्यार्थिनी आणखी काही पायऱ्या चढून वर घेऊन गेली. एका बाजूला गांडूळ खत प्रकल्प दिसत होता. आणखी एक जिना चढलो आणि मग दिसला इ लर्निंग कक्ष. तिथंच छानसं ग्रंथालय आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचे तब्बल 68 कविता संग्रह आहेत. हो, आणि एक गोष्ट तुम्हांला सांगायची राहिलीच, या शाळेतील बहुतांश विद्यार्थी म्हणजे ऊसतोडणी कामगारांची मुलं आहेत. म्हणूनच शाळेच्या समोर ऊस तोडणी मजुरांच्या मुलांसाठी शाळेने बांधलेलं हंगामी वसतिगृह आहे.
त्याआधी मुलांनी संपूर्ण शाळेसमोर माझी एक छोटेखानी मुलाखत घेतली. दोन विद्यार्थिनी मुलाखत कर्त्या होत्या आणि शाळेतील कोणताही विद्यार्थी प्रश्न विचारीत होता. फक्त मराठीतच नव्हे तर, उत्तम इंग्रजीत सुद्धा मुलं-मुली वेगवेगळे प्रश्न विचारीत होते.
शाळेतील मुलांची सर्वांगीण प्रगती पाहून मी थक्क झाले. याबद्दल संदीप पवार सरांशी संवाद साधला असता ते म्हणाले, “मी जेव्हा शाळेत रूजू झालो, तेव्हा तिथे गावाचा उखंडा होता. लोक तिथे कचरा टाकायचे, गायी- गुरांना चरायला आणायचे. शाळेत विद्यार्थ्यांना यावेसे वाटले पाहिजे असे स्वच्छ आणि चांगले वातावरण हवे, असे मला वाटत होते. मी गावकऱ्यांना विनंती केली आणि हळूहळू शाळा आमचीच आहे, या भावनेने ग्रामस्थ मदत करू लागले.
शाळेचा विस्तार करून शाळा आठवीपर्यंत करायची होती, तेव्हा गावकऱ्यांनी पुढाकार घेत शाळेला दोन एकर जागा दान दिली. या गावातील बहुतांश कुटुंबांचे हातावर पोट आहे, तरीही लोकांनी जवळपास साडेसतरा हजार रुपयांची लोकवर्गणी शाळेला गोळा करून दिली.”
सरशाळेत गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम घेतात. त्यात विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन, गटात अभ्यास घेणे, रेडिओ आणि टीव्हीवरील अभ्यासाशी निगडित कार्यक्रमांची मदत घेणे, असे प्रयोग करतात. अभ्यासाशिवाय वर्तमानपत्र आणि पुस्तकांचे अवांतर वाचन, वक्तृत्त्व, कविता लेखनासारख्या वेगवेगळ्या स्पर्धा, स्काऊट- गाईड यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना दिली जाते.

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment