Monday 23 July 2018

नगरचा सेंद्रिय माल पुण्यात ५२ ठिकाणी घरपोच, २०० ठिकाणी दुकानातून विक्री. मुंबईत ५० ठिकाणी घरपोच, ३२ दुकानातून विक्री.

अहमदनगरपासून ३५-४० किलोमीटरवर तालुक्यातलं शेवटचं गाव- गुंडेगाव. तिन्ही बाजूनं डोंगर. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून. अलीकडेच जलयुक्त शिवार योजनेत सहभाग. त्यामुळे पाण्याची सोय झालेली गावात हुलगे, मटकी, कारळे, मूग, उडीद, तीळ, सोयाबीन, जवस, तूर,बाजरी, ज्वारी यांची शेती. पूर्वीपासूनच शेतमाल बहुतांशकरून सेंद्रियच. मात्र माल दर्जेदार असूनही अंतरामुळे बाजारपेठ मिळत नसे. 
साधारण १५ वर्षांपूर्वी संतोष भापकर यांनी गावातल्या प्रगतिशील शेतकऱ्यांना एकत्र आणलं. मग झाली 'संपूर्ण शेतकरी गटाची' स्थापना. १०० सदस्य . १८०० एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती. त्यासाठी गोमूत्र, शेणखत , पंचामृताचा वापर. संतोष यांनी मालाची पुण्या-मुंबईत कशा प्रकारे विक्री करता येईल , याचा अभ्यास केला. काहींना मार्केटिंगचं प्रशिक्षण दिलं.
गटातल्या शेतकऱ्यांकडून संतोष बाजारभावापेक्षा जास्त दरानं खरेदी करतात. मालाची रस्त्याच्या बाजूला विक्री होते. रस्त्याने प्रवास करणार्‍या, माल खरिदणार्‍या प्रवाशांना व्हिझिटिंग कार्डस देणं सुरू केलं. गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्नांना चांगलं यश आलं. मासिक उलाढाल पाच लाख रुपये. १०० ग्रॅम ते पाच किलोचं पॅकिंग पुण्यात ५२ ठिकाणी घरपोच. २०० ठिकाणी दुकानातून विक्री. तर मुंबईत ५० ठिकाणी घरपोच, ३२ दुकानातून विक्री. ऑर्डर घेण्यासाठी संपूर्ण शेतकरी नावाचं अँप विकसित...एवढं सगळं घडलं.
संतोष यांच्या पत्नी ज्योती विक्री व्यवस्था बघतात. श्रीगोंद्याच्या ज्योती, एमएसस्सी ऑरगॅनिक. सन २०१३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या. रायगड जिल्ह्यात नायब तहसीलदारपदी त्यांची नियुक्तीही निश्चित होती. मात्र गटासाठीच काम करण्याचं ध्येय ठेवत त्यांनी नोकरी नाकारली.
-सूर्यकांत नेटके,अहमदनगर

No comments:

Post a Comment