Saturday 21 July 2018

आम्ही तुम्हाला शिकवलं, तर तुम्ही शिकाल का?


अमरावती शहर. गजबजलेला इर्विन चौक. दररोज मॉर्निग वॉकसाठी इथं येणाऱ्या आलोक आणि रुचिर यांच्याकडे परिसरात फिरणाऱ्या मुलांनी कधी पैसे, बिस्कीट मागणं हेही रोजचंच. हे रोजचं चित्र बघून हे दोघं विचलित झाले. या मुलांनी शाळेत जाण्याऐवजी अशा प्रकारे पैसे मागणं दोघानांही पटेना. त्यांनी सहजच मुलांकडे शाळेबद्दल चौकशी केली. आम्हांला शाळेत घातलेलं नाही, असं उत्तर मुलांकडून आलं. आम्ही जर तुम्हाला शिकवलं तर तुम्ही शिकाल का? या आलोकच्या प्रश्नावर मुलांनी होकार दिला अन फुटपाथवरच्या शाळेला सुरुवात झाली. लगेच दुसऱ्या दिवसापासून चौकातील बंद दुकानांसमोर सकाळी साडेसहा ते आठ यावेळेत शाळा भरू लागली.
आलोक कुमार मूळचा वाराणसीचा तर रुचिर त्यागी ग्वाल्हेरचा. दोघंही इंदूर आयआयटीमधून बीटेक झाले आहेत. तीन वर्षांपासून दोघंही अमरावतीत एका खाजगी शिकवणी वर्गात मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवतात.
शाळेत सुरुवातीला आली तीन मुलं. हळूहळू संख्या वाढत गेली. आणि शाळेत आता १५ ते २० मुलं येऊ लागली. मुलं शाळेत यावीत, रमावीत म्हणून या दोघांनी त्यांना पाटी, पुस्तक, वह्या दिल्याच. शिवाय रोजच्या नाश्त्याचीही सोय केली. शिकवणी सुरु झाल्यानंतर १० ते १२ दिवसातच मुलं इंग्रजी, मराठी वर्णमाला, अंक ओळख, पाढे पटापट शिकू लागली. आपली मुलं शिकत आहेत हे पाहून आई - वडीलही त्यांना नियमित या शाळेत पाठवत आहेत. यापैकी १२ मुलांना या शैक्षणिक सत्रापासून अमरावती महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशसुद्धा देण्यात आला आहे. आता शहरात इतरत्र फिरणाऱ्या मुलांचा शोध घेऊन त्यांनाही या शाळेत आणण्याची इच्छा आलोक व रुचिर यांनी व्यक्त केली आहे.
- अमोल देशमुख.

No comments:

Post a Comment