Saturday 24 December 2016

तृतीयपंथीय बनले ‘पोलीस मित्र’


तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणाचा एक प्रयत्न ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा-भाईंदरमध्ये केला आहे. याठिकाणी महाराष्ट्र पोलिसांच्या 'पोलीस मित्र' या उपक्रमांतर्गत तृतीयपंथीयांना समाविष्ट करण्यात आलं आहे.
काशीमिरा इथे काही तृतीयपंथीयांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पळून जाणार्‍या चोरांना पकडून देण्यात पोलिसांना मदत केली. ही घटना कलाटणी देणारी ठरली. मग त्यांना ‘पोलीस मित्र’ होण्यासाठी तयार करण्यात आलं. सध्या मीरा-भाईंदर उपविभागात 2 2 तृतीयपंथीय पोलीस मित्र म्हणून काम करत आहेत. नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता निर्माण करणं, वाहतुकीचं, गर्दीचं नियमन, सुरक्षा, भुरटय़ा चोरांचा माग काढणं, पोलिसांना खबर देणं अशी विविध कामं ते करतात. त्यांच्यातले काही जण तर पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलेही आहेत अशी माहिती मीरा रोडचे पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी दिली. वाहतुकीचं नियमन करणाऱ्या, नियम समजावून सांगणाऱ्या या ‘पोलीस मित्रां’चं म्हणणं नागरिक ऐकून घेतात, त्यांच्याशी अदबीने वागतात असं बावचे यांनी सांगितलं.
तृतीयपंथीयांकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे. तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असे अनेक उपक्रम राबवण्याची गरज आहे. त्यातूनच त्यांच्या पूर्वापार जीवनमानात बदल घडू शकेल आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. शिक्षण आणि कौशल्यविकास प्रशिक्षणाची त्यांना गरज आहे.
2011 च्या जनगणनेनुसार देशात तृतीयपंथीयांची संख्या एकूण 4 लाख 87हजार 803 आहे त्यापैकी फक्त 46%साक्षर आहेत. भीक मागणारे, नाचगाणी करणारे, मनोरंजन करणारे यापलीकडे जाऊन त्यांना ओळख मिळाली पाहिजे. माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितले गेलं पाहिजे.


- सोनाली काकडे-कुळकर्णी

No comments:

Post a Comment