Wednesday 28 December 2016

पर्यावरण रक्षणाचा ‘प्रयास’

अहमदनगरचा निझामशाहा मुर्तझा द्विहतीय यांचा मंत्री मलिक अंबरने वसवलेले शहर ही औरंगाबादची ओळख. पाणचक्‍की, सोनेरी महल, ऐतिहासिक बौध्‍द लेणी व बावन्‍न दरवाज्‍याचे शहर म्‍हणूनही हे ओळखले जाते. आज शहराचं रूपडं बदललं तरी, ऐतिहासिक महत्‍त्‍व तसूभरही कमी झालेलं नाही. मात्र, श्रेष्‍ठत्‍वाचा अभिमान बाळगणा-या येथील राजकीय पक्षांनी महत्‍त्‍वाची पदे स्‍वत:कडे ठेवून विकासालाच खीळ घातली. यामुळे या एतिहासिक शहराची ओळख धुळीचे शहर म्‍हणून होते की काय?.... असा प्रश्‍न शहरात पाऊल ठेवलेल्‍या प्रत्‍येक पर्यटकांबरोबरच स्‍थानिक नागरिकांनाही पडला आहे. शहराचा चहुबाजूने वाढणारा आकार आणि विकासाचे ठोस नियोजन नसल्‍याने पर्यावरणाचा मोठया प्रमाणात होणारा -हास होत गेला. 
या ऐतिहासिक शहराला सुंदर व स्‍वच्‍छ कसे करता येर्इल? पर्यावरणाचा -हास थांबण्‍यासाठी काय उपाययोजना करत येतील? याचा ध्‍यास घेतलेल्‍या सुभाष चव्‍हाण आणि रवी चौधरी या दोन युवकांनी पर्यावरणाची झीज भरून काढण्‍यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रयत्‍न सुरू केले. 'ट्रेंकिंग'ची आवड असणा-या या तरूणांनी शहराच्‍या भवतालच्‍या ओसाड डोंगरावर वृक्षारोपण करायला सुरूवात केली. शहराबाहेरील डोंगर माथ्‍यावर झाडे लावत असताना डोंगराच्‍या पायथ्‍याशी अस्ताव्यस्‍त पडलेला कचरा गोळा करण्‍याचे काम नित्‍यनियमाने सुरू झाले. 

या कामाला मूर्त स्‍वरूप देण्‍यासाठी सुभाष व रवी यांनी २०१० साली "Prayas Youth Foundation" ची स्‍थापना केली. यामाध्यमातून समविचारी तरूण एकत्र आले. तरूणांच्या सहकार्याने डोंगर माथ्यावर व पायथ्याला वृक्षारोपण करण्यास सुरूवात केली. मात्र, लावलेल्या झाडांचे संगोपन कोणी करायचे हा प्रश्न 'प्रयास' समोर उभा राहिला. ही जबाबदारी 'प्रयास'लाच पार पाडावी लागली. मग शहरातीलच रिकाम्या जागेत झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील विभागीय क्रीडा संकूल, उल्का नगरी, हडको, ज्योती नगर या भागासह विद्यापीठ परिसरातील डोंगराच्या पायथ्याला वृक्षारोपण करण्यास सुरूवात झाली. मात्र, विद्यापीठातील डोंगराळ भागातील खडकावर लावलेली झाडे जगणार नाहीत. याची कल्पना असल्याने डोंगराळ भागात काळी माती टाकल्यानंतर झाडे लावण्यात आली. सहा वर्षांच्‍या कार्यकाळात औरंगाबाद शहरात प्रयासतर्फे तब्‍बल 7000 हजार झाडे लावण्‍यात आली. यापैकी आज 5500 झाडे डौलात उभी आहेत.


वृक्षारोपणासाठी झाडांची रोपटी उपलब्‍ध करणे गरजेचे होते. यासाठीही 'प्रयास'ला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. पण वृक्षारोपणाचे काम बंद पडू नये यासाठी वेगवेगळया पातळीवर त्यांनी कामाचे नियोजन केले. यातूनच मग वेगवेगळया कल्‍पना सुचत गेल्‍या. वाढदिवसाचा खर्च टाळून या दिवशी कमीत-कमी एक झाड लावण्‍याचे नियोजन प्रयासच्‍या सदस्‍यांनी केले. सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून पर्यावरण प्रेमींना मदतीचे आवाहन करण्‍यात आले. या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागला. काही नागरिकांनी रोख रक्‍कमेच्‍या स्‍वरूपात तर काहींनी घरातील वृत्‍तपत्रांची रद्दी मदत स्‍वरूपात दिली. या रद्दीची विक्री करून प्रयासच्‍या कामासाठी पैसा उभा करण्‍यात आला. 
वृक्षारोपण करण्‍याबरोबच शहराला स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी नवरात्र, गणपती उत्‍सवाच्‍या काळात पूजेसाठी वापरण्‍यात येणारे निर्माल्‍य गोळा करण्‍यात येते. या निर्माल्‍यातून कुजणारा कचरा वेगळा केल्‍यानंतर तो जमिनीत पुरण्‍याचे काम प्रयासचे सदस्‍य नित्येनेमाने करतात. या उपक्रमामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्‍यात ब-या पैकी यश आले आहे. अगोदर स्‍वत: करावे आणि मग इतरांना सांगावे या नियमाचा अवलंब केल्‍याने शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याविषयी शहरातील महाविद्यालयात, शाळांमध्‍ये पर्यावरण सवंर्धनानिमित्‍त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते. याबरोबच शहिद दिन व कारगील दिनानिमित्‍त प्रत्‍येक वर्षी वृक्षारोपण केले जाते. 
"Prayas Youth Foundation" शहरात राबवण्‍यात येणारे उपक्रम : - 
- Mission Respect, Project Green Belt, My University-My Pride
पर्यावरणासंदर्भात राबवण्‍यात येणारे उपक्रम :- 
- वृक्षारोपण, इकोफ्रेंडली होळी, सेव्ह बर्ड्स कँपेनींग, निर्माल्‍य संकलन, क्लिनींग ड्राईव्‍ह, माती व पाणी संरक्षण
 हनुमंत लवाळे

No comments:

Post a Comment