Friday 30 December 2016

बालमजुरांसाठी आगळा प्रयोग – व्यावसायिक शिक्षण

लवकरच सर्व शाळांचे आवार प्रदीर्घ सुट्टीनंतर गजबजायला सुरुवात होईल. नवे दप्तर, नवी वह्या पुस्तके यासह नव्याची नवलाई आणि नव्या वर्गाची ऊत्सुकता डोळ्यात साठवत ही बच्चे कंपनी शाळेची पायरी ओलांडतील. मात्र आज शाळा या संकल्पनेपासून कित्येक बालके कोसो मैल दूर आहेत. कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या या बालकांना कायद्याच्या लेखी ‘बाल मजूर’ म्हणून ओळखले जाते. शासकीय दरबारी त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यात त्यांच्या पुनर्वसनापेक्षा त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येथील औद्योगिक कामगार आयुक्त प्रयत्नशील आहेत. मालेगाव शहरात अशा बालकांसाठी अभ्यासक्रम तयार करत व्होकेशनल प्रशिक्षण देणारा खास अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. 


राज्य शासनाने २००९ मध्ये ‘राईट टू एज्युकेशन’ च्या माध्यमातून शिक्षणाची दारे दिव्यांगासह समाजातील वंचित दुर्बल घटकांना खुली केली. त्यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सादही घातली गेली. मात्र आजही हजारो बालके ही आर्थिक विवंचना आणि भ्रामक समजुती यामुळे शिक्षणापासून वंचित आहेत. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर औद्योगिक कामगार आयुक्तांकडून झालेल्या सर्वेक्षणात ९ ते १४ वयोगटातील १,२५४ मुले ही शाळा बाह्य सापडली असून ती बालमजूर आहेत. मालेगाव शहरात हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५० टक्के असून महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद हद्दीत हे प्रमाण तुलनेत कमी आहे. यात मुलीचे प्रमाण सर्वाधिक आहे. शाळा गळती मागे आर्थिक विवंचना आणि बाह्य जगतातील असुरक्षितता यामुळेही पालक मुलींना शाळेत पाठवत नाहीत. दुसरीकडे मुलेही केवळ घरातील कर्ता पुरुष होण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांचे शिक्षणावरील लक्ष उडाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे बाल मजुरीवर काम करणाऱ्यासमोर आवाहन ठरते. कामगार आयुक्त कार्यालयाने यासाठी विशेष प्रकल्पाची आखणी केली. ज्या ठिकाणी ५० हून अधिक बालमजूर आढळले त्या परिसरात आठवड्याची शाळा किंवा दररोज वर्ग राबविण्याचे ठरवले. त्यासाठी पारंपारिक शैक्षणिक अभ्याक्रमाची चौकट मोडत अनौपचारिक वर्ग भरविण्यात येत आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी बालमजूर असले तरी संख्या ५० च्या आत असल्याने तेथे वर्ग भरवता येत नसल्याची खंत प्रकल्प अधिकारी जयप्रकाश देशमुख यांनी व्यक्त केली. 
दुसरीकडे मालेगाव मध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्याने तेथे नियमितपणे हे वर्ग भरवले जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यासाठी बालमजुरांची मानसिकता, बौद्धिक क्षमता आणि वय यांचा विचार करता त्यांच्यासाठी केवळ अक्षर ओळख आणि अंक ओळख, गणिती संकल्पना यासह काही मह्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करत अभ्यासक्रम तयार केला आहे. प्राथमिक तयारी पूर्ण केल्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. ते नियमित शाळेत जात आहेत की नाही याची तपासणीही वेळोवेळी होते आहे. कामगार उपायुक्तांच्या प्रयत्नामुळे गेल्या काही वर्षात या माध्यमातून ४० बालमजूर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. काहींनी १० वी पर्यत मजल मारली आहे. यंदाही चालू शैक्षणिक वर्षात १५-२० विद्यार्थी नियमितपणे शाळेत जातील असे देशमुख यांनी सांगितले. मात्र हे प्राथमिक शिक्षण घेतांना मुळे कंटाळतात. त्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही कौशल्ये विकसित व्हावी यासाठी ‘व्होकेशनल’ वर्गही भरविण्यात येतो. यात मार्केटींगसह ब्रान्डिंग यावर भर देण्यात येत आहे.
- प्राची उन्मेष

No comments:

Post a Comment