Friday 30 December 2016

बिनभिंतीची शाळा

चार भिंतीचे वर्ग, त्यात कोंबलेली पाच-पन्नास पोर. कुणीतरी ठरवून दिलेला अभ्यासक्रम आणि त्याच्या घोकंपट्टीला शाळा म्हणत त्यातून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची अपेक्षा करणाऱ्या आजच्या व्यवस्थेत साताठ तरुणांनी आपल्या पातळीवर शिकण्याची व्याख्या बदलण्याच ठरवल आणि उभी राहिली एक बिनभिंतीची शाळा. या शाळेला भिंती नाहीत, अभ्यास नाही, गृहपाठ नाही, परीक्षा नाही आणि पास नापासाचे मापदंडही नाहीत. खेळा आणि फक्त खेळा अस म्हणणारी ही शाळा दर शनिवारी भरते. ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलात. तिच नावच आहे 'स्कूल विदाउट वॉल्स' बिनभिंतीची शाळा.
परिस्थितीशी जुळवून हवे ते साध्य करणारा तरुण म्हणजे पंकज गुरव. बारावीमध्ये जवळपास सर्वच विषयांत नापास होणारा हा तरूण आज येऊर मध्ये लहान मुलांमध्ये बिनभिंतीची शाळा चालवत आहे. विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करून आलेले सामाजिक भानच त्याच्यासाठी दिशादर्शक ठरले.


चिरागनगर इथल्या वस्तीत राहणारा पंकज गुरव 'समता विचारक संस्थे'च्या विविध उपक्रमांमध्ये २००२ पासून काम करत होता. गावाभेटीच्या उपक्रमातून विविध गावांच्या समस्यांची जाणीव पंकजला झाली. 'केवळ येउन भेटी देता, आमच्यासाठी तुम्ही काय केलत…' हा गावकऱ्याचा सवाल पंकजच्या मनाला टोचणी लाऊन गेला. तेव्हाच ग्रामीण भागातील मुलांसाठी वेगळे काम करण्याचा निश्चय त्याने केला.
येऊर गावात पंकजने बिनभिंतीची शाळा सुरू केली. खेळ, नाटक, नृत्य आणि अभ्यासाशिवाय अनेक उपक्रम या शाळेत घेतले जातात. मात्र यातून मिळणारे शिक्षण हे माणूस घडणीचे आणि आयुष्याला आकार देणारेच असते. दोन वर्षांपूर्वी केवळ शनिवारीच हे वर्ग चालत असत. आता जास्त सघनपणे चालवण्याचा विचार आहे. ठाण्यातील दुसऱ्या एक नामवंत सामाजिक संस्थेने, 'वी नीड यू' या संस्थेने, त्यासाठी मदतीचा हात नुकताच पुढे केला आहे.
मुलांकडून चर्चात्मक उपक्रम घेतले जातात. खेळाचा तास झाला तरी जिंकलेल्या आणि हरलेल्या अशा दोन्ही गटांमध्ये त्यांच्या कामगिरीचा उहापोह केला जातो. त्यातून मुलांच्या चुका समजतात आणि त्या सुधारण्याची संधी मिळते.
सुरवातीला मुल-मुली एकत्र खेळायला तयार नसायचे. आता ते कोणताही संकोच न बाळगता एकत्र खेळतात. कोणते खेळ खेळायचे हे त्यांनाच ठरवू दिल जात. कोणत्याही साहित्याशिवाय स्थानिक खेळांवर भर असतो. मात्र खेळांतून शिक्षण कस देता येइल, भूगोल, गणित वगैरे विषयांशी जोडण्यावर भर असतो.


ठाण्यापासून इतक्या जवळ असूनही या मुलांचा शहरी संस्कृतीशी कोणताही परिचय नाही. शाळेत येण्यापेक्षा आई-वडिलांबरोबर जंगलात जाण, त्यांना कामात मदत कारण, धाकट्या भावंडांना सांभाळण, जंगलात रहात असल्यामुळे जनावरांच्या भीतीने लवकर घरी जाण या त्यांच्या सहाजिक गरजेच्या गोष्टी.
शहनाज शेख, महेश बागल, रश्मी पाटील, गौरव गुरव, पूजा प्रभाकर, अपूर्वा शाळीग्राम वगैरे कार्यकर्ते पंकजचे सहकारी आहेत. बिनभिंतीची शाळा सुरू झाल्यापासून हळूहळू उपस्थिती वाढू लागली. पाचवीत शिकणाऱ्या मुलाला स्वत:चे नावही लिहिता येत नाही अशी परिस्थिती होती. अशा मुलांना अक्षर ओळखण्याचे शिक्षण देण्यात आले.
'वंचितांचा रंगमंच' या ठाण्यातील अभिनव उपक्रमात या शाळेच्या मुलांचा सहभाग असतो आणि त्यात त्यांनी पारितोषिके मिळवली ज्याचे महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकारांनी खूप कौतूक केले आणि मुलांना प्रोत्साहन दिले. अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतून आलेल्या पंकजने अशाच वर्गातील मुलांसाठी उचललेले हे पाउल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

No comments:

Post a Comment