दारूच्या कारखान्यात बाटल्या हाताळणा-या हातांना मोठमोठे ग्रंथ हाताळण्याची सवय लागली. रात्रंदिवस दारूच्या वासात काम करूनही व्यसन लागले ते वाचनाचे. या व्यसनातून मग उभे राहिले एक भव्य ग्रंथालय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाची ही कथा....
इतर सर्वसामान्य माणसासारखे काशीनाथ जाधव पोट भरण्यासाठी औरंगाबादला आले. शिक्षण फक्त बारावी. नोकरी मिळण्याची हमी नाही. कधी भाजी विकून तर कधी लोकांची छोटी-मोठी काम करून उदरनिर्वाह सुरू. तेव्हाच महाराष्ट्र डिस्टीलरी लि. या दारू कारखान्यात तृतीय श्रेणी कामगार म्हणून नोकरीची संधी चालून आली. नोकरीची गरज तर होतीच पण दारूच्या कारखान्यात काम करणे म्हणजे लोकांच्या नजरेतून उतरणे. शिवाय व्यसन जडण्याची भीती होतीच. जो कोणी दारूच्या कारखान्यात काम करतो, तो दारूच्या नादी लागला असे म्हणण्याचा तो काळ. पण पोटासाठी स्थिर नोकरीची गरज होती. काशीनाथ जाधव यांनी हा समज मोडून काढण्याचा निश्चय करीत कारखान्यात पाऊल टाकले.
योगायोगाने या कारखान्यात समविचारी सहकारी लाभल्याने त्यांचे मन थोडे स्थिर झाले. मात्र, दारू तयार करून आपण समाज बिघडवण्याचे काम करीत आहोत अशी बोच त्यांच्या मनात होतीच. नोकरी तर सोडू शकत नाही, पण इतर वेळेत आपण समाजोपयोगी काम करायचे याचा निर्धार करून काशीनाथ जाधव यांनी वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. शाहू-फूले-आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी ग्रंथालयाचा मार्ग योग्य वाटला. कारखान्यात काम करणा-या इतर निर्व्यसनी कामगारांना एकत्र करत त्यांची बैठक घेतली. ग्रंथालय सुरू करण्याचा विचार त्यांच्या समोर मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने संमती दिली. या संमतीनंतर ३१ मार्च १९८२ रोजी घरोघरी जाऊन ११० पुस्तके जमा केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे बीज रोवले.
या ग्रंथालयात आज ३५ हजार पुस्तके आहेत. दररोज ७०० ते ८०० वाचक ग्रंथालयात येतात. सुरूवातीला फक्त ५०० रूपये अनुदान मिळत असे. आज या ग्रंथालयाला वर्षाला चार लाख रूपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. बालसाहित्य, विद्यार्थी, तरूण यांच्याबरोबरच मोठयांसाठी विविध पुस्तके इथे उपलब्ध आहेत. कार्ल मार्क्सपासून ते विविध विचारवंतांची पुस्तके, संदर्भ ग्रंथांचे भांडार उपलब्ध आहे. ३ सप्टेंबर १९८३ रोजी वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मा. शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. सुप्रिया सुळे यांनी अर्थिक मदत केल्याने या वाचनालयाची सुसज्ज इमारत जवाहर कॉलनीत उभी आहे.
मराठवाडा वृत्तपत्र बंद पडल्यानंतर कार्यालयातील सर्व फर्निचर अशोक भालेराव यांनी वाचनालयात वापरण्यासाठी दिेले. आज या वाचनालयाचे 1500 सभासद आहेत. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाचनालय सुरू असते. विद्यार्थ्यांचे अभ्यासवर्ग येथे सतत होत असतात. नीलिमा पोखारे आणि वनिता खोत या दोघी ग्रंथालयाचे काम समर्थपणे संभाळत आहेत.
दारूच्या कारखान्यात काम करत असताना होणारे शारीरिक श्रम, मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी तेथील कामगार दारूकडे वळलेले दिसतात. काशीनाथ जाधव आणि त्यांचे सहकाऱ्यांनी मात्र या वेदनांवरचा उतारा पुस्तकांमध्ये शोधला आहे. आज त्यांच्या जीवनाला एक नवे परिमाण लाभल्याने मोठी वाचक चळवळ उभी राहिली.
हनुमंत लवाळे.
हनुमंत लवाळे.
No comments:
Post a Comment