Thursday 20 April 2017

घर ज्यांचे दूर गेले....

तीन वर्ष वय असताना वडील सोडून गेले, पाठोपाठ काही दिवसातच आई सोडून गेली. जग कळायच्या आत माय-बापाच्या मायेला ती पोरकी झाली. थकलेल्या आजी-आजोबांनी आधार दिला. तीन-चार वर्षांनी त्यांनाही संभाळणं अवघड झालं. अनाथ प्रतिक्षाला (नाव बदललं आहे) ‘सावली’चा आधार मिळाला अन्‌ जगायला वाट मिळाली. ‘दहा-अकरा वर्ष झाली, मी इथं राहतेय. हे माझं घर आहे. मी अनाथ आहे असं मला कधी वाटतच नाही, अन्‌ वाटणारही नाही’, अकरावीत शिकणारी प्रतिक्षा सांगत होती.
नगरच्याकेडगावांतलं 'सावली' नावाचं अनाथालय. म्हणायला अनाथालय. पण खरंतर आई-वडील नसलेल्या मुलांचं हक्काचं घर. आणि नात्यातल्या माणसांनी सोडलेल्या लेकरांना आधार देणारी, जगवणारी आणि नव्या उमेदीने जगायला सांगणारी एक संस्था. येथे गेल्या दहा-अकरा वर्षापासून राहणारी प्रतिक्षा बोलती झाली. 
संस्थेचे अध्यक्ष नितीन बनसोडे यांनी प्रतिक्षाचा जीवनपट उलगडला. ते म्हणाले, ‘शहरातील एका नावाजलेल्या भागात राहणारं एक कुटूंब. त्यांना तीन वर्षांची मुलगी. सुरळीत संसार सुरु असताना दृष्ट लागली. आई-वडील गेले. एका मित्राकडून तिच्याविषयी समजले. मी तिचा सांभाळ करण्याची जबाबादारी घेतली. नियमानुसार सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आणि ती सावलीत दाखल झाली. शाळेत घातलं. तिच्या सारख्या अनेक मुली इथं घरातल्यासारख्या वावरत आहेत’. 
बनसोडे सांगत होते की, ‘सरकारी नियमानुसार अनाथालयात सहा ते अठरा वर्षापर्यत राहता येतं. त्यानंतर त्यांनी जायचं कुठे हा आमच्यासाठी कायमचा प्रश्नच असतो. म्हणून मी त्या मुलांचे नातेवाईक शोधून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यत मी दोनशे पेक्षा जास्त मुलांना नातेवाईक शोधून त्यांचे पुनर्वसन केलेय. काही मुलांना रोजगार मिळवून दिलाय. इथे संख्येपेक्षा मुलांना मी आधार देऊ शकतो हे मी महत्वाचे मानतो.'
आईवडील नसलेला प्रत्येक जण जगात अनाथच असतो. मात्र जग कळायच्या आत अनाथ झाल्यावर ज्यांना आधाराची गरज असते, ती सावलीतून मिळते हे प्रतिक्षांच्या बोलण्यातून दिसत होते, म्हणूनच
"घर ज्यांचे दूर गेले, इथे उरली सावली
याच इथे छताखाली, नाती इथे विसावली''
कवी संतोष पवार यांच्या या कवितेच्या ओळी खरंच जोडलेल्या नात्याची आणि 'सावली'तल्या सावलीची प्रचिती देते.
 - सूर्यकांत नेटके.

No comments:

Post a Comment