Wednesday 5 April 2017

सावलीमुळं सुटला गुन्हेगारीचा शिक्का

अजय मूळचा पैठाणचा. लहानपणीच आई- बापाचं छत्र हरवलं अन पोटापाण्याची जबाबदारी वृध्द आजोबांवर पडली. आजोबांचं वय झालेलं. त्यामुळं हाताला काम नाही. मग एका मंदिराच्या आश्रयाला राहू लागले. मंदिरात येणा-या भाविकांकडून मिळणारे पैसे व वस्तू यातून नातू- आजोबा गुजराण करू लागले. मिळालं तर खायचं नाहीतर पोटभर पाणी पिऊन झोपायचं. अशा त-हेने नातू- आजोबांचा जीवनाशी संघर्ष चालू होता. 
अजय लहान होता पण गुणी, प्रामाणिक होता. लवकर उठून मंदिराची झाडलोट करून वृद्ध आजोबांची सेवा करत असे. एक दिवस अचानक कुणी तरी आजोबांचा खून केला. अन गणेशचं मायेचं शेवटचं पांघरूणही नियतीनं हिसकावून घेतलं. पुढे खुनाचा तपास चालू झाला. गुन्हेगार सापडला नाही म्हणून पोलिसांनी खुनाचा आरोप अजयवर केला. हाणून-मारून त्याला गुन्हेगार केला अन बालसुधारगृहात नेलं गेलं. तिथंही शारीरिक आणि मानसिक छळ वाट्याला आला. बालगुन्हेगाराचा शिक्काच त्याला लावला गेला. बाहेरच्या जगाची सर्व कवाडे त्याच्यासाठी बंद झाली होती. ही कवाडे कधीच उघडणार नाहीत या भीतीने तो पूर्ण खचला होता. प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. चार वर्ष अशीच गेली. 

 एक दिवस बालसुधारगृहातील अधिका-यांचा 'सावली'अनाथाश्रमाच्या नितेश बनसोडे यांना फोन आला. त्यांनी अजयला सावलीत नेण्याचा आग्रह केला. नितेश यांनी लगेच कागदपत्रांची पूर्तता करून अजयची सुटका केली. त्यावेळी त्याचं वय होतं नऊ वर्ष. या दरम्यान त्याचं शिक्षण काहीच झालं नव्हतं. सावलीत आला तेव्हा खूप अशक्त, शांत आणि एकटा एकटा राहत होता. अशा वेळी त्याला सावरणं सावलीसमोरचं मोठं आव्हान होतं. बनसोडे यांनी ते स्वीकारलं अन पेललं देखील! अजय म्हणतो, मी सावलीत आलो नसतो तर माझ्यावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का कधीच पुसला गेला नसता.
आता अजॅयमध्ये बदल होऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे त्याची शाळा सुरु झाली आहे. आणि सावलीच्या विविध उपक्रमात हिरारीनं भाग घेत आहे.
 बाळू भांगरे, 

No comments:

Post a Comment