Wednesday 5 April 2017

कुटुंब रंगलंय गोपालनात

अहमदनगर येथील निसळ गुरुजींच्या गोशाळेची ही गोष्ट. गुरुजी व्यवसायाने पुरोहित. पौरोहित्य करताना यज्ञ, होम करावेच लागतात. त्यासाठी शेण, गोवऱ्या, गोमूत्र लागायचे. म्हणून त्यांनी एक गीर गोवंशाची कालवड विकत घेतली. या गाईची सहा वितं घरातच घेतली. यातून आज 16 गाईंची आधुनिक गोशाळा आकाराला आलीय. आता थारपारकर जातीची देशी गाय नव्याने आलीय. सावरकर म्हणायचे गोपूजन नको गोपालन हवे. निसळ गुरुजींकडे दोन्हीही चालते. वडील दत्तात्रेय निसळ, पत्नी सोनाली आणि गायत्री, रेणुका, वेद अशी तिन्ही मुलं असं अख्खं कुटुंबच रंगलंय गोपालनात.
‘आज अडीच एकर शेत, घर, चारचाकी गाडी आणि सुबत्ता आहे, हे सगळं या गोधनामुळेच’, गुरुजी सांगत होते. दोन वर्षे दुष्काळ पडला, चारा महागला तरी गुरुजींनी गाई विकल्या नाहीत. गीर जातीच्या गाई १४ लिटर दूध देतात. निसळ गुरुजींनी दुधाचा व्यवसाय केला असता तर आणखी कमाई झाली असती. पण ते गाईच्या दुधावर पहिला हक्क वासरांचा मानतात. त्यामुळे गाई- वासरे दिवसभर मोकळे असतात. रात्री त्यांना बांधून सकाळचे दूध काढले जाते. बाकी दिवसभर वासरे दूध पित असतात. एक वेळचे दूधच ते काढतात. आणि ५० रुपये लिटरने ज्या घरात लहान मुले आहेत अशा कुटुंबालाच विकतात.
अहमदनगर येथील बँक कॉलनी भागात गुरुजींनी घरातच आधुनिक गोशाळा काढलीय. शेणाचा वापर गोबर गॅससाठी होतो. त्यावर स्वयंपाक होतो. गोबर गॅसची स्लरी पाईपद्वारे जमा करून शेतात खत म्हणून वापरतात आणि गोवऱ्या बनवतात. या गोशाळेत गाईंना स्वयंचलीत वॉटर सिस्टिमद्वारे हवे तेव्हा पाणी देता येते. गोमूत्र एका ड्रममध्ये जमा केले जाते. दूध मशिनद्वारे काढले जाते. कडबा बारीक करण्यासाठी कुट्टी मशीन, चारा साठवणीसाठी व्यवस्था आहे. गोशाळेत सी सी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे २४ तास गाईंवर नजर ठेवता येते.
आयुर्वेदात गाईच्या शुद्ध तुपाचे गुणधर्म सांगितले आहेत. ते तयार करण्याची खास पद्धधत आहे. जी अतिशय कष्टाची आहे. पितळी, लोखंडाची भांडी वापरून लाकडी रवीने घुसळून हे तूप त्यांच्या पत्नी सोनालीताई बनवतात. हे तूप अडीच हजार रु. किलो भावाने विकले जाते. त्यासाठी ऍडव्हान्स बुकींग होते. आता गुरुजींनी शेत जमीन घेतली आहे. आता गोशाळा या शेतात स्थलांतरित केली आहे.

- सुरेश कुलकर्णी.

No comments:

Post a Comment