Monday 24 April 2017

मुलांना त्यांच्या आवडीनुसार वागू द्यायचं

"अपघात म्हणजे काय, आई? त्यांचे चेहरे का झाकलेत? सर्वजण टाळ्या का वाजताय? मोदींनी काय सांगितलं? तुम्ही काय ऐकताय?..." अशा प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. एका प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत दुसरा प्रश्न पुढ्यात येऊन उभा. त्यांना कार्टुन पाहा सांगितलं की मुलं बातम्या किंवा ‘आस्था’वर योगासनं पाहतात. मात्र मी बातम्या पाहण्यासाठी रिमोट हातात घेतला की त्यांना कार्टुन किंवा आवडती मालिका पहायची असते. त्यावेळी मुलांना त्यांच्या आवडीनुसार वागू द्यायचं किंवा काय हा प्रश्न मला पडतो. 
२०१०मध्ये आर्या आणि रुद्रच्या रुपात दोन चिमुकले जीव एकत्रच माझ्या ओंजळीत आले. त्या चिमुकल्यांना बघायला येणार्यांनकडून नातं सांगण्याची स्पर्धा सुरू असतांना त्या दोघांना एकत्र वाढविणं कसोटी ठरणार याची प्रचिती येण्यास सुरूवात झाली. माझी नोकरी असली तरी आमचं एकत्र कुटुंब असल्याने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी माझ्या एकटीवर आलीच नाही. घरातल्या प्रत्येकाने माझा भार हलका केला. सुजाण पालकत्व, मुले कशी वाढवणार अशी काही पुस्तकं वाचली. मात्र पालक या शब्दाशी खरी ओळख व्हायला सुरूवात झाली ती पूर्व प्राथमिकच्या वर्गात प्रवेश घेतला तेव्हापासून. त्यांना अभ्यासाची गोडी लावायची, त्यांचे लाड पुरवतानाही शिस्तही लावायची. त्यांच्यासाठी काय योग्य काय नाही हे ठवायचं. त्यांच्या खेळकर वृत्तीला विधायकतेकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. अशी पालक म्हणून आपली परीक्षा सुरूच राहते. 
आर्या आणि रुद्र दोघेही वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असल्याने दोघांना एकाच वेळी वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. ती एकमेकांशी तुलनाही करतात. त्याला तसं, मग मला असं का? हा मुलांकडून विचारला जाणारा प्रश्न माझ्या सहनशक्तीचा अंत पाहणारा असतो.
आर्या हसरी, खेळकर, अभ्यासासाठी आग्रही, नीटनेटकी, सर्व कामांमध्ये स्वतःहून पुढाकार घेणारी, सगळं काही शिकण्याची तयारी दाखवणारी. रुद्र नेमका उलट. नाव सार्थ करणारा. जरा मनाविरूध्द काही घडलं तर चिडणारा. अभ्यास सोडून सर्व काही बोला हा त्याचा तोरा. या दोघांना सांभाळतांना लक्षात आलं की पुस्तकी ‘सुजाण पालकत्व’ इथे कामी येणार नाही.
अभ्यासात त्यांनी पुढे असावं हा आग्रह नाही पण आपण काय शिकतोय हे त्यांना किमान कळावं, कळलेलं इतरांपर्यंत पोचवता यावं, ही अपेक्षा आहे. माझ्या कामानिमित्ताने समाजात काय घडतयं हे वेळोवेळी समजत असतं. ते मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्नही करते. दिवसभरात काय बातम्या केल्या, कुठे गेले हा तपशील मुलांना रोज सांगते. त्यांच्या परीने आकलन करून घेत असतीलच. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं एवढंच माझ्या हातात असतं. बातम्या सुरू झाल्या की आई, तुझी बातमी यात का नाही? मग तू नव्हती का गेलीस, त्या कार्यक्रमाला? असे अनेक प्रश्न. संगोपन असं खास काही करत नाही. पण माझ्या मुलांनी एक चांगली व्यक्ती व्हावं. आपल्याला मिळणार्याच सुखसुविधा काहींना मिळतदेखील नाहीत, ही जाणीव त्यांनी ठेवावी हीच माझी इच्छा. 
 चारूशीला कुलकर्णी.

No comments:

Post a Comment