Wednesday 5 April 2017

शिक्षणाचं महत्त्व उमजलं

बापू तुकाराम तर्टे यांचा केडगाव (अहमदनगर) बस स्टँडवर १५ वर्षांपासून चहाचा व्यवसाय. त्यांच्यासोबत असतात भक्कम साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी शकुंतला. बापू सांगतात, ‘आधी मी एका कंपनीत काम करत होतो. पण कंपनी बंद पडली अन हा व्यवसाय सुरु करावा लागला’.
बापूंना दोन मुलं. मुलीचं लग्न करून दिलेलं. मुलगा परशुराम आधी पेट्रोल पंपावर काम करत होता. पण त्यातली अस्थिरता, १२ तास काम करूनही मिळणारा अपुरा पगार. मग त्यानंही बापूंच्या ठेल्याच्या बाजूलाच सरबताची गाडी लावली अन बापूंच्या पावलावर पाऊल ठेवले.
बापू सांगत होते, ‘घराचं भाडं तीन हजार अन लाईट बिल पकडून चार हजार हा ठरलेला खर्च. धंदा कधी होतो तर कधी नाही. तर अशा परिस्थितीत कशी गुजराण करायची’.
बापूंचा १५ वर्षाचा नातूही त्यांच्याकडेच शिक्षणासाठी राहिला आहे. त्याचं दहावीचं वर्ष. सगळे बापूंना सांगतात, की बापू त्याला अभ्यास करू द्या. त्याचं महत्वाचं वर्ष आहे. अर्थात बापूंची बंद पडलेली कंपनी, चालू करावा लागलेला व्यवसाय आणि घर परत उभं करणं हे सगळच बापूंना जाणवतं. त्यातूनच लोकांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्व आता त्यांना पटलं आहे. आपण किंवा मुलगा शिकला असता तर आज आपली परिस्थिती वेगळी असती याची जाणीवही बापूंना असल्याचं जाणवतं. ‘आज शिकलो असतो तर ही वेळ आली नसती’ बापू बोलून दाखवतात. 
- मनोज आहेर, मुंबई

No comments:

Post a Comment