Wednesday 2 August 2017

मालपुरातली सलोख्याची माळ



सामाजिक सलोखा बिघडत चालला असल्याचं आपल्याला दिसतं. तरी एकता, बंधुभाव टिकून असणारी गावंही दिसतात. यापैकीच एक महाराष्ट्रातलं धुळे जिल्ह्यातलं, शिंदखेडा तालुक्यातलं मालपूर गाव. या गावात ३६ विविध जाती-धर्माचे लोक राहातात. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, धनगर, मराठा, कुणबी, राजपूत, कोळी, माळी अशी इथली जात-धर्मविविधता. हे सारे लोक मालपुरात पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आहेत.



जिल्ह्याच्या ठिकाणापासून ७० किलोमीटर अंतरावरचं हे १५ ह्जार लोकसंख्येचं मोठं गाव. ग्रामपंचायत सदस्य १७. इथली ग्रामपंचायत निवडणूकदेखील बिनविरोध झालेली. इथे कधी जाती-धर्मावरून मोठा तंटा झालेला नाही. किरकोळ भांडणतंटे आपसातच सामंजस्याने सोडवले जातात. पोलीस गावात आलेच तर फेरफटका मारायला येतात. कुठला गुन्हा दाखल करण्याचा आहे म्हणून पोलीस गावात आलेलेच नाहीत.
गावात राजेशाही काळातल्या खुणा आहेत. गावात काही सोयी आहेत. काही गैरसोयीदेखील आहेत. गावात स्त्रिया एकोप्याने आणि पुरुषही मिळून-मिसळून राहतात. एकमेकांच्या सुख दुःखात नातेवाइकांआधी गावकरीच साथ देतात. कोणावर संकट आलं तर सगळेजण एकत्र येऊन दूर सारतात. गावाने टिकवलेलं बहुविधता, एकोपा, सलोखा हे सगळं पुढच्या पिढीकडेही संक्रमित केलं आहे. गावाने राजेशाही पाहिली, ब्रिटिशांचा काळ पहिला. आता लोकशाही व्यवस्थेने गावाचा कारभार चालतो. मोठा कालप्रवाह लोटला तरी गावातला सद्भाव आटला नाही. उलट वाढलाच आहे. 

 - प्रशांत परदेशी.

No comments:

Post a Comment