Sunday 25 November 2018

मला माझ्या शाळेनं काय दिलं? - -आमदार उदय सामंत.


माझे बालपणातील ते दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसतात. मित्रांसोबत गप्पा मारणे, कधी खूप मस्ती करणे तर कधी शिक्षकांना घाबरून गुपचुप बसणे, अभ्यासाचे टेन्शन नव्हते तरीदेखील गुरूजींच्या भीतीने वेळेत परिपाठ करणे, कधी दांडी मारणे, मधल्या सुट्टीत सर्वांसोबत जेवणे, शाळेचा स्नेहसंमेलनाचा दिवस या सगळ्या गोष्टींतून माझे बालपण कधी निघून गेले कळलेच नाही. ते दिवस आठवले की आजही मला आनंद होतो. त्या आठवणी आजही माझ्या मनाच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत.
माझ्यावेळी सर, मॅडम असा प्रकार नव्हता. गुरूजी आणि बाई असे शिक्षकांना संबोधत होतो. त्यांचा मुलांवर आदरयुक्त धाक होता. त्या भीतीने का होईने आम्ही सर्व मुले घाबरून वेळेवर अभ्यास करणे, शिस्तबध्द वागणे हे संस्कार आपोआपच आमच्यावर झाले. तसेच घरी आईवडिलांचा प्रेमळ धाक त्यामुळे वर्तणुकीबद्दल कोणाची तक्रार नाही. शाळेत जाताना मज्जा वाटायची, कोणताही ताणतणाव अगदी पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत नव्हता. आज प्राथमिक शिक्षण घेतानाही मुले तणावाखाली दिसतात.
माझ्यावेळी शाळेत आम्ही सर्व मुलांनी अंगण सारवले आहे. हे काम करताना कमीपणा वाटायचा नाही, उत्साहाने आम्ही काम करत होतो. शाळेत कधीच असुरक्षित वाटलं नाही. त्यावेळी माध्यमे नसल्याने जीवनाचा पुरेपूर आनंद मुलं घेत होती. आता माध्यमांचा प्रभाव तसंच शाळेतील अभ्यासाचा ओझं कमी होणं गरजेचं आहे, मुलांपासून त्यांचे बालपण हिरावून घेऊ नये. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करू नये.
माझे शिक्षण पाली येथे जिल्हा परिषद शाळेत झाले. पण लहानपणापासून समूहामध्ये राहण्याची सवय असल्याने आज राजकारणात यशस्वी झालो. शिक्षणामुळे राजकारणात नाही आलो तर जपलेल्या माणुसकी, आपुलकीमुळे नेतृत्वाची क्षमता निर्माण झाली. आज शेकडो नागरिकांच्या मला शुभेच्छा आहेत. त्यामुळे शिक्षण घेणे महत्वाचे आहेच. पण, आपल्यातील चांगल्या कौशल्यांना वाव देणेही महत्त्वाचे आहे.
- आमदार उदय सामंत, रत्नागिरी मतदारसंघ आणि अध्यक्ष, म्हाडा
शब्दांकन - जान्हवी पाटील.

No comments:

Post a Comment