Tuesday 13 November 2018

पालावर साजरी झाली दिवाळी

जालना जिल्ह्यातलं अंबड शहर. दिवाळीचे दिवस. शहराबाहेरच्या पालांवर लगबग सुरू होती. ‘समाजभान’ची टीम आली होती. पणत्या, सुगंधी तेल, उटणी, साबण, कपडे, फटाके, फराळ आणि उत्साह आपुलकी घेऊन. ''आपण खूप आनंदात सण साजरे करतो. पण शहराबाहेरच्या राहुट्यांमध्ये उत्सवांमुळे काहीच फरक पडत नाही. फिरस्तीवर असणाऱ्यांच्या पालांवर दिवाळीतही अंधारच असतो.'' ‘समाजभान’चे दादासाहेब थेटे सांगत होते. थेटे इंदिरानगर मधल्या छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयात 

शिक्षक. अंबड, घनसावंगी तालुक्यातल्या गोरगरीब, तांड्यांवर राहणाऱ्या मुलांचं, पालकांचं प्रबोधन करून त्यांना शाळेत आणलं आहे. ‘समाजभान’ची सुरुवात 2011 च्या दिवाळीत 20 समविचारी मित्रांच्या चर्चेतून झाली. सुरवातीचं नाव मैत्रेय प्रतिष्ठान. बाबा आमटे त्यांचं प्रेरणास्थान. आनंदवनातून परतल्यानंतर 2016 मध्ये ‘समाजभान’ असं नामकरण. समाजभान टीममध्ये अखंड कार्यरत असणारे 20 जण. याखेरीज मोहिमेसोबत कार्य करणारे जिल्हाभरात 1 हजार मित्र.
2016 पासून ' एक दिवा पेटवूया , चला दिवाळी साजरी करूया' उपक्रम. गेल्या वर्षी सौर उर्जेवर चालणारे दिवे तांड्यावर वाटण्यात आले होते. यावेळीही वंचित घटकांसोबत आणि पालावरही दिवाळी साजरी होईल, अशी आखणी करण्यात आली. 15 दिवस आधी तयारीला सुरुवात. शहरातल्या दानशूर व्यक्तींचाही सहभाग. कुणी चिवडा,लाडू,शंकरपाळी,फराळाची जबाबदारी पार पाडली तर कुणी इतर सामग्रीची.
पालावर 130 ऊसतोड कामगार. या कुटुंबांबरोबरच भंगारवेचक, एचआयव्हीग्रस्त अशा 320 हून अधिक महिलांना साड्या वाटण्यात आल्या. 450 हून अधिक मुलांना फटाके आणि खाऊ. समाजभानमुळे खऱ्या अर्थानं वंचितांची दिवाळी साजरी झाली.
-अनंत साळी.

No comments:

Post a Comment