Tuesday 24 January 2017

ट्री बँकेला देऊ साथ, करू दुष्काळावर मात



यंदाचा पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी लातूर जिल्ह्यात अजूनही समाधानकारक असा मोठा पाऊस झालेला नाही. टँकरने पाणीपुरवठा अजूनही सुरूच आहे. ना धरणांना, ना विहीरींना, ना बोअर्सना पाणी आले. जलराणीचा प्रवासही सुरूच आहे. उन्हाळ्यातील परिस्थिती जुलैमध्येही ‘जैसे थे’ च आहे.
एक गोष्ट मात्र नक्की घडली. यंदाच्या दुष्काळामुळे सगळ्यांचे डोळे उघडले असावेत, दुष्काळावर मात करण्यासाठी लोक सहभागातून जलसंधारण, जलपुनर्भरणसारख्या मोहिमा सुरू झाल्या. पाण्याचे महत्त्व सगळ्यांच्याच लक्षात आल्यामुळे प्रत्येक नागरिक या मोहिमांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवू लागला आहे. आता या मोहिमांना लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

जमिनीत पाणी मुरविणे आणि पाऊस पडण्यासाठी वृक्षांची लागवड अत्यावश्यक आहे. वृक्षलागवडीचे महत्त्व कळाल्याने शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमाबरोबरच विविध संस्था, संघटना आणि व्यक्ती अशा सर्वांनीच वृक्षलागवडीचा ध्यास घेतलेला दिसून येत आहे. 
पर्यावरणात होत असलेले बदल, त्याचा शेती व्यवसायावर होत असलेला विपरित परिणाम, शिवाय पाणीटंचाईच्या दाहकतेवर या वृक्ष लागवडीमुळे मात करता येऊ शकेल. ही बाब लक्षात घेऊन लातूर शहरातील ५० हून अधिक विविध सामाजिक संस्था, संघटनांनी एकत्र येऊन ‘लातूर वृक्ष’ हा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लातूर हिरवेगार करण्यासाठी या शहरातील टाऊन हॉल मैदानावर ‘ट्री बँक’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आ. अमित विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेतलेला आहे. या उपक्रमाची रीतसर सुरूवात ५ जूनला करण्यात आली. आता मोहीम व्यापक झाली आहे.
लातूर शहर आणि जिल्ह्यातील वनराई वाढविण्यासाठी तब्बल १० वर्षांचा कृती कार्यक्रम आखून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. केवळ वृक्ष लागवड नाही, तर लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणे हा मुख्य हेतू आहे. ‘ट्री बँक’ मधून शहरातील शाळा, संस्था, संघटना शिवाय नागरिकांना रोपांचे वाटप करण्यात येत आहे. रोप वाटीकांचे प्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप, रस्त्यांच्या बाजूला खड्डे खोदून वृक्ष लागवड करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेणे. असे काम उत्साहात सुरु आहे.
शाळांबरोबरच महाविद्यालयीन युवक-युवतींचाही सहभाग उल्लेखनीय आहे. हा वृक्ष लागवडीचा उपक्रम आता लोकचळवळ बनला आहे. आगामी काळात लातूर हिरवेगार होऊन मुबलक पाऊस पडेल. अशी आशा सगळ्यांनाच आहे. हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘लातूर वृक्ष’च्या सुपर्ण जगताप, अर्जुन कामदार, सत्यजित देशमुख, सिकंदर पटेल, कृष्णकुमार बांगड, ईश्वर बाहेती, व्यंकट गर्जे, मनोज सूर्यवंशी, रितेश चापशी, सतीश नरहरे, संगमेश्वर बोमणे, शिरीष पोफळे, डॉ. पवन लड्डा, श्रीकांत हिरेमठ, प्रा. ओमप्रकाश झुरुळे, महेश बिडवे, अमृत सोनवणे, गुरुनाथ मग्गे, श्रीकांत कर्वा, सोनू डगवाले, डॉ भास्कर बोरगावकर, रमेश शिंदे, हेमंत रामढवे, आदित्य चव्हाण, राम चलवाड, मुकेश रादंड, नयन राजमाने, स्मिता आयाचित, कांता बांगड, श्रीमती कुलकर्णी आदी शिलेदार प्रयत्नशील आहेत.
- शिवाजी कांबळे

No comments:

Post a Comment