Sunday 29 January 2017

पालक चिमुकल्या रानफुलांचा!


जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे, असं उगीच म्हटलं जात नाही. जीवघेण्या दुष्काळाशी दोन हात करताना बालग्राम या सहारा अनाथालयातील दोनशे बालकं अन् निसर्ग सौंदर्य वाढवणारी झाडं कशी जगवायची? या विचारात न खचता, संकटाचा सामना करणार्या् संतोष गर्जे यांनी बीड जिल्ह्यातील गेवराईत दुष्काळाशी दोन हात करून चिमुकल्यांच्या चेहर्यारवर आनंद फुलवलाच, फळा-फुलांची झाडेही जगवली आणि उजाड डोंगरमाथाही चिमुकल्यांच्या मदतीने सुजलाम सुफलाम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड जिल्ह्यातील गेवराई हा तालुका. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी संतोष गर्जे या युवकाने वयाच्या विसाव्या वर्षी वंंचित घटकांसाठी काम सुरू केले. संतोष गर्जे यांचं शेतकरी कुटुंब. संतोष यांचं शिक्षण सुरु असतानाच मोठ्या बहिणीचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. तिची अडीच वर्षाची मुलगी पोरकी झाली. यातून संतोष गर्जे हळवे झाले. माझ्या भाचीप्रमाणे आई-वडील नसलेल्या अनाथांची काय अवस्था असेल, हा विचार डोक्यात घर करु लागला. रेड लाईट एरिया, बंजारा वस्तीतील मुलांच्या समस्या दिसू लागल्या. गेवराईत चकरा वाढल्या. याबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकर्यांमची मुले, गुन्हेगारीमुळे कारागृहात असलेल्यांची मुले, विधवा, परित्यक्त्यांची मुले डोळ्यासमोर दिसू लागली. रोजगाराचा शोध घेतांना मुलांसाठीच काहीतरी करायचे ठरविले. लोकांसमोर पदर पसरला. एक एक करत २००४मध्ये १२ लाख रुपयांचा निधी जमला. यातून जातेगाव रोडला तीन एकर जमीन खरेदी केली आणि सहारा अनाथालय सुरु झालं. आज ८९ मुलांना इथे आकार निवारा लाभला आणि शिक्षणाची सोयही झाली.
हिरवाईने नटलेल्या गोदाकाठच्या गेवराई तालुक्यालाही मागील तीन वर्षांत दुष्काळानं छळलं. यात सहारा अनाथालय टिकत नाही, अशी वेळ आली. बालकांना कसं जगवावं, हा प्रश्नड निर्माण झाला. अन्नाची सोय कशीही करता येईल, प्रसंगी आपण भीक मागून लेकरांना जगवू असे ठरवले. परंतू, पाणी कोठून आणणार? शासनाकडून टँकरने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी केलेले प्रयत्नही तोकडे ठरले. मुलं आणि त्यांना जगवणारी माणसं धरून १०० जणांसाठी एक दिवसाआड टँकर लागायचा. रोख पैसे दिल्यावरच खाजगी टँकरमधून पाणी मिळायचे. शालेय साहित्य, खेळणी, बांधकाम साहित्य या गरजा दात्यांकडून मिळणार्याा देणगीतून पूर्ण होतात. परंतू, पाण्यासाठी पैसा कोठून जमवायचा, असा प्रश्नत सतावू लागला. चिमुकल्यांची स्वच्छता ठेवणंही आरोग्यासाठी महत्वाचं होतं. शिवाय बालग्राम परिसरात चिकू, अंजीर, आंबा, चिंच, जांभूळ, आवळा, निंबोणी याप्रकारातील दीडशेंवर झाडे आणि फुलझाडे जोपासली आहेत, पाण्याचा थोडा जरी ताण पडला तरी ती जळून जाऊ लागली. पाण्याच्या आणीबाणीत चिमुकल्या जिवांप्रमाणेच या सचेतन झाडांनाही जगवण्याचं आव्हानं होतं. यावर उपाय म्हणून सांडपाण्याच्या खड्ड्यात थोडीशी सुधारणा करण्यात आली. सांडपाणी खड्ड्यात साचवून झाडांना घालणे सुरू केले. यासाठी मुलांनाही बरीच मेहनत घेतली. यामुळे भयाण दुष्काळातही झाडे तग धरून राहिली. 
प्रबळ आशावाद, नेटके नियोजन आणि अपार कष्ट या बळावर बालग्रामने दुष्काळाशी दोन हात केले. संतोष गर्जे एवढ्यावरच थांबले नाहीत. होळीचा आनंद रंग खेळून आणि हुल्लडबाजीने साजरा केला जातो. बालग्रामच्या बालकांनी गेवराई तालुक्याला एक वेगळी प्रेरणा दिली आहे. तहसीलदार संजय पवार यांचे मार्गदर्शन घेतले आणि तरूणांना जाणिवा प्रगल्भ होण्यासाठी शिबिराचे आयोजन केले. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या बालग्राममध्ये अनोखी होळी साजरी झाली. त्याचवेळी तहसीलदार संजय पवार यांनी हरित गेवराई या संकल्पाची मुहूर्तमेढ येथूनच रोवली. पालख्या नावाच्या डोंगरावर बालग्राममधील बच्चेकंपनीला सोबत घेऊन विविध प्रकारच्या बियांची उधळणी झाली, झाडे लावली. त्या रूजलेल्या बियाणांना आज पाऊस पडताच पालवी फुटली आहे. दुष्काळातही बालमनावर फुंकर घालणार्या संतोष गर्जे यांनी निसर्गही फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
 मुकुंद कुलकर्णी.

No comments:

Post a Comment