Sunday 29 January 2017

चाळीस तासांचा वर्ग !


भारतात ३५ कोटी लोक निरक्षर आहेत. त्यात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत निरक्षर प्रौढांना साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे. विकासाची गती खुंटण्याचं, गरिबीबरोबरच निरक्षरता हेही एक कारण आहे. १५ ते ३० वयोगटातील निरक्षर लोक शाळेत जाण्यासाठी तयार नसतात. वृद्धांना त्यांच्या मुला-मुलींकडून शिकायचे नसते. पोटापाण्यासाठी त्यांना छोटीमोठी कामे करावी लागतात. त्यातून त्यांना वेळ मिळू शकत नाही. आता ह्या वयात शिकून काय करायचे? - असा त्यांचा मूळ प्रश्न. एकदा वय वाढल्यानंतर साक्षर करणे फार कठीण असते. त्यांना विकासात सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना किमान लिहिणे-वाचणे आले पाहिजे. त्यांना सही करता आली पाहिजे. निरनिराळे फॉर्म भरता आले पाहिजेत. हिशोब समजला पाहिजे आणि किमान दोन अंकी आकडेमोड आली पाहिजे.
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नवे डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आता प्रौढ शिक्षण सहज शक्य आहे. या नव्या डिजिटल क्रांतीमुळे ४० तासात निरक्षर लोकांना साक्षर करणे सहज शक्य आहे. या,वर्गात बसा,टीव्ही पाहिल्यासारखे स्क्रीनवर बघा आणि हसत-खेळत शिका. टीव्हीवर जशी सिरीयल नेमाने बघतात, तसे हे ४०- ५० धडे नुसते मन लावून ऐका. ३०० ते ५०० शब्दांची ओळख होईल आणि हे निरक्षर लोक वर्तमानपत्र वाचू लागतील. हे शक्य झाले आहे. ह्या योजनेत २ लाख निरक्षर लोक साक्षर झाले आहेत.
या साक्षरता अभियानासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसिएस)चे माजी संचालक फकीरचंद कोहली ह्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे एक योजना राबवली. प्रौढ शिक्षणतज्ञांचा सल्ला घेऊन एक अतिशय सोपी संगणकीय प्रणाली तयार केली. दृक्‍-श्राव्य तंत्र असल्यामुळे प्रौढ निरक्षर लोक ऐकत–पहात शिकतात. कोणत्याही शिक्षकाची गरज नसते. क्लिक करा आणि कार्यक्रम बघा. ऍनिमेशन तंत्र वापरून वर्गपाठ आखलेला असतो.
या प्रणालीमुळे रोज नवे शिकता येते. रोज थोडी-थोडी शब्दांची ओळख होत जाते. शिकण्याचा उत्साह वाढत जातो. रोज वर्गावर यावेसे वाटते. आधी शब्द समजू लागतात आणि मग अक्षरओळख होते. निरक्षर व्यक्तीला शब्द माहीत असतातच. त्यांना अक्षरओळख नसते. शब्दातून अक्षराकडे असा हा प्रवास आहे. शब्द ओळखू लागले की अक्षरांची ओळख होत जाते. रोज ३० शब्द समजतात. पाच शब्द एका मिनिटात लिहिता येतात. १ ते १०० आकडे मोजता-लिहिता येतात. तीन आकडी बेरीज–वजाबाकी करता येते. दोन आकडी गुणाकार-भागाकार करता येतो. असे हे सोपे तंत्रज्ञान आहे. 
महाकालीच्या वृद्ध आजी आता नातवाबरोबर अभ्यास करू लागल्यात. बसचा नंबर, स्टेशन कोणते आले हे वाचून समजते, बँकेत सही करता येते आणि वर्तमानपत्रातील ठळक बातम्या सहज वाचता येतात याचा त्यांना अधिक आनंद आहे.
-डॉ नरेंद्र गंगाखेडकर 

No comments:

Post a Comment