Sunday 29 January 2017

मळलेल्या वाटेला त्यांनी दिला छेद



चार महिला एकत्र आल्या की, एकमेकांची उणीदुणी काढायची, फार झालं तर सम विचारी महिलांनी एकत्र येत बचत गट स्थापन करून पापड-लोणची व तत्सम व्यवसायाद्वारे अर्थाजन करायचे हा आजवरचा शिरस्ता राहिला आहे. तथापि, आजवरच्या मळलेल्या वाटेला छेद देत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सहकार्याने ग्रामीण भागातील महिलांनी वेगळी वाट धरली. 
माविमच्या सहकार्याने सम व्यवसाय करणाऱ्या महिला एकत्रित आल्या आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टिने पावलं टाकण्यास त्यांची सुरूवात झाली. महिलांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावी यासाठी माविमनेही त्यांना आता विशेष प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. नुकताच त्यांच्यासाठी ‘पशु सखी’ हा अनोखा प्रशिक्षण वर्ग भरविण्यात आला.

माविमने ग्रामीण भागात तेजस्विनी अभियानासह वेगवेगळ्या योजनांतून सक्षमपणे आपली पाळेमुळे रोवत बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून कांदा बीज शेती, मधुमक्षिका पालन, बांबू व्यवसाय, दुग्ध व्यवसाय यासह वेगवेगळे पर्याय शोधले गेले. मात्र एका ठराविक काळानंतर या सर्व प्रकल्पांना खीळ बसल्याने महिलांचे संघटन आणि सक्षमीकरणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला. त्यास शासकीय स्तरावरील अनास्था आणि महिलांमधील वाद याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम या सर्व प्रकल्पांवर झाला. माविमने यातून धडा घेत महिलांचे संघटन करतांना समविचारी, समव्यवसायी महिला एकत्रित आणण्याकडे कल ठेवला. यातून ‘राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना’ अंतर्गत त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. याकरिता नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील बचत गटातील महिलांना एकत्रित आणण्यात आले. त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. यातून त्यांच्या आर्थिक आणि भावनिक गरजांचा विचार करत प्रशिक्षणाची आखणी झाली. बहुतांश महिला या शेतीला पूरक असा पशुपालनाचा व्यवसाय जोडधंदा म्हणून करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पशुपालनच त्यांच्या स्वयंरोजगाराची वाट ठरावी यासाठी माविमने ‘पशु सखी’ हा प्रशिक्षण वर्ग सुरू केला. 
कुक्कुट पालन, शेळी पालन, गो पालन असे विविध गट करत त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात झाली. नाशिक जिल्ह्यात हा वर्ग अलीकडेच जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने भरविण्यात आला. यावेळी महिलांना शेळी पालनाविषयी शास्त्रशुध्द माहिती देण्यात आली. शेळ्यांना आवश्यक चारा, खाद्य, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था कशी असावी याविषयी लेखी, प्रात्यक्षिक तसेच जिल्ह्यात जिथे जिथे शेळी पालन होते, त्या ठिकाणी भेट देत आपल्या व्यवसायात कसा बदल करता येईल यादृष्टिने अभ्यास करण्यात आला. या प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढलाच, पण या माध्यमातून आपल्या कामाचे विपणन कसे करायचे, आपण कुठे कमी पडतो याचा लेखा जोखा सहज मांडला गेला अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी सीमाने मांडली. मीराबाई म्हणते, दादला दुसऱ्याच्या शेतावर काम करतो. आमच्याकडे दोन शेळ्या आहेत. आता गावातील अशाच सगळ्या आम्ही एकत्र येऊन काम करू म्हणजे पैसेही अधिक मिळतील
प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment