
बिजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वापसा ही झीरोबजेट शेतीची चतु:सूत्री.

होळगे यांनी हेच तंत्र वापरलं. आणि शेतात गतवर्षी पाच एकर डाळींब लागवड केली. पाण्याचा दुष्काळ असल्याने बोअरच्या तुटपुंज्या पाण्यातून त्यांनी डाळींबाची १५०० झाडे जगविली. यावर्षी यातल्या दोन एकर डाळींबाच्या शेतात बटाटे, काऱ्हाळ, लसूण आणि मोहरी ही आंतरपिके घेतली. सध्या डाळींबाची झाडे लहान असल्याने त्यांचे उत्पन्न नाही. त्यामुळे यावर्षी मुख्य पीक बटाटा हेच आहे. या पिकाचा खर्च आंतरपिकांत वसूल झाला आहे. केवळ देशी गाईच्या शेण-गोमुत्रापासून शेतातच बनविलेल्या जीवामृताच्या फवारण्या यामुळे बटाटे पीक उत्तम आलेले आहे.
दुसरीकडे तीन एकर डाळींबाच्या शेतात गव्हाचे मुख्य पीक घेतले आहे आणि त्यात हरभरा आणि मोहरी, कोथिंबीर, गवार ही आंतरपिके घेतली आहेत. तिथे साठ क्विंटल गव्हाचे उत्पादन अपेक्षित आहे.
बाजूच्या शेतकरी मित्रांकडे प्रचंड रासायनिक खते, कीटकनाशके आणि औषधांच्या फवारण्या करून फक्त गव्हाचे एकच पीक असल्याचे होळगे सांगतात. होळगे यांच्या गव्हाची ओंबी मोठी आहे आणि गव्हाच्या दाण्याची संख्याही जास्त आहे. गव्हाआधी याच तीन एकरात त्यांनी खरीपात २२ क्विंटल सोयाबीन आणि पाच क्विंटल तुरीचे उत्पन्न मिळवले आहे. होळगे म्हणतात, ‘हे तंत्र वापरून शेतीला सुरुवात केल्यानंतर आमच्या मागचा सावकार सुटला. दरवर्षी पेरणीच्या वेळी ३० हजारांची रासायनिक खते लागायची, पुन्हा चांगल्या पिकासाठी दहा हजाराचे डी.ए.पी. खत लागायचे. शिवाय कीटक आणि तणनाशके लागायची ती वेगळीच. त्यातून ५०-६० हजारांची उधारी व्हायची. नगदी पैसे नसल्यामुळे दुकानदार उधारीत जो भाव लावेल तो मुकाट्याने द्यावा लागायचा. मग कापूस किंवा अन्य पिके येताच दुकानदार सव्वापट रक्कम वसूल करायचा. सुमारे ७० ते ८० हजार रुपये उत्पादनातून दुकानदार म्हणजेच सावकाराला द्यावे लागत’. हा भुर्दंड या तंत्राने वाचवला आणि सावकार सुटला आहे.
- सु. मा. कुळकर्णी.
No comments:
Post a Comment