Saturday 25 February 2017

आता आनंदी शिकेल

अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील २८ वर्षाचे युवा शेतकरी गणेश रामदास सरोदे यांनी २०१३ मध्ये आत्महत्या केली. शिक्षित असल्याने, आत्महत्येपूर्वी गणेशने पुण्यात नोकरी शोधली. मात्र, तिथे जम न बसल्याने तो गावी परतला आणि वडिलोपार्जित दोन एकर शेती सांभाळून उदरनिर्वाह करू लागला. निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक समाधानकारक होत नव्हते आणि कर्जाचा डोंगर वाढत होता. यामुळेच त्याने २०१३ मध्ये आत्महत्या केली. 
पतीनिधनानंतर सासू- सासर्‍यांचा सांभाळ आणि मुलगी आनंदी हिचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी गणेशची पत्नी सुवर्णा सरोदे हिच्यावर आली. नापिकीमुळे आलेल्या हलाखीच्या स्थितीत शिवणकामातून कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न सुवर्णा करतेय. गावातील तलाठी संदीप बोळे यांना हे कळले. आणि गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी त्यांनी चार वर्षाच्या आनंदीच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. आनंदी सध्या नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे.
 तलाठ्यांच्या भ्रष्टाचारावर टीका होते. पण संदीप बोळे यांच्या सदाचाराचं कौतुकही करायला पाहिजे. प्रशासनाचा परीघ ओलांडून, माणुसकीचं वर्तुळ त्यांनी पूर्ण केलंय. अकोल्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सुरु केलेल्या ‘मिशन दिलासा’ मधून हे काम करण्याची प्रेरणा मिळाली, असं संदीप बोळे सांगतात.


- कुंदन जाधव.

No comments:

Post a Comment