Saturday 25 November 2017

एकाच दिवशी 11 हजार विद्यार्थी शाळेत दाखल!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा : एकाच दिवशी 11 हजार विद्यार्थी शाळेत दाखल!
शाळेच्या प्रांगणात उंच उभारलेली गुढी, सजविलेल्या बैलबंडीतून मुलांची निघालेली मिरवणूक, मुलांच्या डोक्यावरच्या रंगीबेरंगी टोप्या, हातात पकडलेले रंगीबेरंगी फुगे आणि पुष्पगुच्छ स्वीकारून स्मितहास्य करणारे पालक या दृश्याची गोंदिया जिल्ह्याला आता सवय झालेली आहे. राज्यात सर्वत्र पहिलीच्या मुलांचे प्रवेश जून महिन्यातच होतात, गोंदियामधे मात्र विद्यार्थी मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पहिलीत दाखल होतात. यावर्षी तर गोंदिया जिल्ह्यात गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच 28 मार्च 2017 रोजी तब्बल 10,922 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमाचे नाव आहे 'गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा'!!
2015- 2016 च्या शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची सुरूवात झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून या 'प्रवेशगुढी' उपक्रमाची सुरूवात झाली. या उपक्रमातंर्गत गुढीपाडव्याआधी दहा दिवस जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गावातील पहिलीत दाखल होऊ शकणाऱ्या मुलामुलींची माहिती काढतात. त्यांची यादी बनवून, त्यांच्या आई- वडिलांना प्रत्यक्ष भेटून, त्यांना जिल्हा परिषद शाळेतच दाखल करण्याची विनंती करतात. शिवाय गोंदिया जिल्हयातील सर्व 1048 शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या झालेल्या असून सर्व शाळा डिजिटल आहेत. 

जिल्हा परिषद शाळांमधे सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती ऐकून पालकही खुष होतात. या प्रयत्नांना गेल्या दोन वर्षांपासून चांगले यश मिळते आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडे पालकांचा असलेला ओढा कमी होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची भरमसाठ फी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नावाखाली प्रत्येक वेळी पालकांच्या खिशाला लागणारी कात्री, हे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधे मात्र अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कमीतकमी खर्चात केले जातात. शिवाय शाळेत प्रवेश घेताना कसलेही डोनेशन अथवा फी भरावी लागत नाही.
पालकांना पटवून झाले की प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेत अतिशय उत्साहाने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत होते. जिल्ह्यात सर्वत्र नव्याने पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची आणि शाळेत सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशफेरी निघते. विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी टोप्या दिल्या जातात. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना फुगे आणि रंगीत फुले दिली जातात. 'गुढीपाडवा- शाळाप्रवेश वाढवा', 'आमचा ध्यास- गुणवत्ता विकास', 'साडेपाच वर्षांचे मूल- दाखल करा, दाखल करा' अशा घोषणा उत्साहात देत गावातून विद्यार्थी आणि शिक्षकांची प्रवेशफेरी निघते. मोहगाव तिल्ली जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतर्फे तर केळीच्या पानांनी, आंब्याच्या तोरणांनी आणि फुग्यांनी सजविलेल्या बैलबंडीतून पहिलीतील मुलांची प्रवेशफेरी निघते आणि शाळेत त्यांच्या हस्ते प्रवेशगुढी उभारली जाते.
तसेच यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावे - 'आम्हीही जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. आम्हांला सार्थ अभिमान आहे- जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा!' अशा आशयाच्या जाहिरातींचे फ्लेक्स लावण्यात आले होते. खरोखर शोध घ्यायला गेले तर बहुतांश सनदी अधिकारी हे जिल्हा परिषद अथवा मनपाच्या शाळेतून शिकलेलेच असतात. त्यामुळे तुम्हांला गुणवत्ता पाहिजे असेल तर जिल्हा परिषद शाळांना पर्याय नाही, हे आम्ही लोकांवर ठसविण्याचा प्रयत्न करीत आहोत. परिणामस्वरुप यंदा तब्बल 10,922 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला.
गोंदियामधील या अभिनव प्रवेशगुढी उपक्रमाबद्दल विस्ताराने जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/…/11000-students-enrolled-in-a-singl…/

No comments:

Post a Comment