बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं कडा गाव. संजय भोजने यांचं गावात कृषी सेवा केंद्र आहे. त्यांच्याकडे शेतकरी बी-बियाणं खरेदी करण्यास येत, त्यावेळी तयार रोपं कुणाकडे मिळतील का याचीही चौकशी करत.
साधारणपणे महिना दीड महिन्यात रोपं तयार होतात. चांगली वाढलेली रोपं मग कृषी सेवा केंद्रात विक्रीसाठी ठेवली जातात. वांगी, टोमॅटो, मिरची या भाज्यांची साधारण वीस हजार रोपं महिन्याकाठी तयार करतात. एक रुपयाला एक रोप याप्रमाणे रोपाची विक्री केली जाते. रोपांसाठी चांगलं बी वापरलं जात असल्याने शेतकरी याच रोपांची मागणी करतात. वर्षभरात सगळा खर्च वजा जाता किमान लाखभर रुपयाचं उत्पन्न मिळतं. अलीकडेच त्यांनी पपई आणि शेवग्याची रोपंही तयार करून विकण्यास सुरवात केली आहे. मात्र या रोपांना अधिक मेहनत लागते. आणि प्लास्टिक बॅगमध्ये तयार करावी लागत असल्याने या रोपांची किंमत जास्त आहे.
एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यावर विक्रीसाठी मार्केट शोधावं लागतं. पण इथे मार्केट उपलब्ध असताना उत्पादन तयार करण्याची गरज होती. सासू-सुनेने एकत्र येऊन हे घडवून आणलं, पेललं. गेली अडीच वर्षे त्यांचा हा रोपवाटिकेचा व्यवसाय यशस्वीपणे सुरू आहे. स्वतःच्या शेतात काम केल्याचा आनंद ही रोपं तयार करताना मिळतो, असं वयाची साठी पार केलेल्या सासू यमुनाबाई म्हणतात. जोडीने आणि गोडीनेदेखील काम करणार्या यमुना-मनीषा या सासू-सुनेचं मालिकांमध्ये दाखवण्यात येणारं नकारात्मक नातं खोटं ठरवतात.
– राजेश राऊत.
No comments:
Post a Comment